मुंबई- मेट्रो कारशेड समितीकडून सादर करण्यात आलेला अहवालात कारशेड दुसऱ्या ठिकाणी हलवणे व्यवहार्य नसल्याचे नमूद केले आहे. जर असा अहवाल ठाकरे सरकारने नेमलेल्या मेट्रो कारशेड समितीने दिला असेल तर तो अहवाल सरकारने अमान्य करावा, अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
फडणवीस सरकारच्या काळात आरेतील कारशेडला शिवसेना, विरोधीपक्षासह मनसेने विरोध केला होता. ठाकरे सरकार सत्तेत आल्यावर त्यांनी त्वरित आरेतील कामाला स्थगिती दिली होती. तसेच आरेतील कारशेड स्थलांतरित करता येईल का यासाठी एक समिती गठीत केली. आता समितीने दिलेला अहवाल राज्य सरकार स्वीकारणार आहे का? सत्तेत आल्या नंतर शिवसेनेची भूमिका बदलली का ? असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर, सरकारने आरेतील करशेड हटवावे, असे पुन्हा एकदा देशपांडे यांनी सांगितले.