मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोशयारी (Governor Bhagat Singh Koshayari) यांच्या विरोधात पुन्हा उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी विरोधात मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रिट याचिका दाखल झाली आहे. छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि मराठी माणसाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.
राज्यपाल गोत्यात ? अनुसूचित जाती, जनजाती प्रतिबंधक अधिनियम 2015, कलम 3 (1) अन्वये दाखल करण्यात आलेली हि याचिका आहे. महाराष्ट्राचे राज्यापल आणि भाजपा खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या विधानामुळे अनुसूचित जाती सोबतचं सर्वसामान्य लोकांची भावना दुखावली असल्याचा याचिकेत आरोप करण्यात आला आहे. (PIL Against Koshyari) लवकरच या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकाकर्त्या रमा अरविंद यांच्या वतीने वकील अमित कटारनवरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
काय म्हणाले होते राज्यपाल? : काही दिवसांपूर्वी औरंगाबादच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ व्या दीक्षान्त समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. 'शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो असल्याचे कोश्यारी म्हणाले होते. यानंतर राज्यभर ठिकठिकाणी त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. तसेच माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी राज्यपालांचा विरोध केला. उदयनराजेंनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना पत्रही लिहिले असून राज्यपालांना पदावरून दूर हटवले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आधीच्या काळात शिवाजी महाराज आदर्श : शाळेत शिक्षण घेत असताना आम्हाला शिक्षक तुमचे आवडते नेते कोण असा प्रश्न विचारायचे तेव्हा आमच्यापैकी काही जण सुभाषचंद्र बोस,महात्मा गांधी तर काही जण पंडित जवाहरलाल नेहरू यांचं नाव सांगायचे. आधीच्या काळात शिवाजी हेही आदर्श होते. आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते नितीन गडकरी पर्यंत अनेक नेते आयकॉन बनले आहेत. असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी म्हटलं होतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 62 वा दीक्षांत समारंभ पार पडला. या कार्यक्रमात ते बोलत होते.