लातूर - राज्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात शिवजयंती पार पडत असताना उदगीरमध्ये मात्र शिव प्रेमींनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. शहरातील अश्वारूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महराज व शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण न केल्यामुळे जिजाऊ ब्रिगेडच्या महिला आणि नागरिकांनी मुख्य रस्त्यावरच रास्तारोको केला. या प्रश्नांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
शिवजयंतीसाठी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण करणे क्रमप्राप्त होते. मात्र, याकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष केल्याने आंदोलक आक्रमक झाले. शिवजयंतीच्या दिवशी ही उदासिनता असल्याने संतप्त जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी पुतळ्याच्या ठिकाणीचे ठिय्या देत रास्तारोको केला. त्यामुळे शिवजयंतीचा उत्सवाची उत्सुकता कमी झाली. तसेच या आंदोलनामुळे शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता.
शिवजयंतीनिमित्त सामूहिक पाळणा म्हणण्यासाठी महिला एकत्र आल्या होत्या. परंतु, पुतळ्याची झालेली दैनावस्था पाहात सर्व कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली; आणि त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. यामुळे मुख्य मार्गावर काही काळ वाहतुककोंडी झाली होती.