कोल्हापूर - राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याचे वंशज व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी आज (शुक्रवार) शाहू महाराजांच्या 146 व्या जयंतीनिमित्त राधानगरी धरणास भेट देऊन त्यांना अभिवादन केले. संस्थान काळात छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरी धरण बांधून सर्वात मोठे लोकहिताचे कार्य केले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण व्हावे आणि समाज कार्यास प्रेरणा तसेच स्फूर्ती मिळावी. या हेतूने राधानगरी धरणस्थळी भेट देऊन त्यांच्या कार्याला अभिवादन केले असल्याचे समरजितराजे घाटगेंनी म्हटले.
यावेळी धरणस्थळावरील शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पाहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. तसेच शाहू स्मारकाच्या सुरू असलेल्या कामाचीही त्यांनी घेतली. यावेळी समरजितराजेंनी वीज निर्मिती केंद्र ,स्वयंचलित दरवाजे व धरण परिसराची पाहणी करून त्याची माहीती घेतली.
समरजितराजे घाटगे म्हणाले की, "जेव्हा या धरणाचे काम पूर्ण होईल तेव्हा माझ्या जीवनाचे कार्य पूर्ण होईल." असे शब्द ज्या राधानगरी धरणाच्या प्रकल्पाला उद्देशून राजर्षी शाहू महाराजांनी लिहिले, त्यांच्या कार्याची ओळख भारतासह जगभरात पोहोचली. शाहू महाराज यांचे क्रांतिकारी विचार आणि स्फुर्तीदायी चरित्र समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचावे. त्यांच्या अलौकिक विचारातून आणि कार्यातून नव्या पिढीला स्फुर्ती मिळावी. राजर्षी शाहू महाराज आणि पिराजीराव महाराज यांनी कोल्हापूर संस्थानचा सर्वांगीण विकासाचा घेतलेला ध्यास, त्यासाठीचे त्यांचे प्रयत्न आजच्या पिढीला समजावेत. यासाठी माझे प्रयत्न कायम राहणार असल्याचे समरजितसिंह घाटगे म्हणाले.
![Samarjit Singh Ghatge visited Radhanagari Dam On the occasion of Rajarshi Shahu maharaj Jayanti,](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-kop-04-samarjit-ghatage-on-shahu-jayanti-story-2020-7204450_26062020152529_2606f_1593165329_1089.jpg)