जळगाव- राज्यात पहिल्या तृतीयपंथी ग्रामपंचायत सदस्याचा सन्मान जळगावातील भादली बुद्रुक गावातील अंजली यांना मिळाला आहे. पाहुयात या संदर्भातील सविस्तर वृत्तान्त.
असा होता अंजलीचा प्रवास- जळगावपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भादली बुद्रुक या गावातील रहिवासी असलेली अंजली गुरु संजना जान ( Anjali Guru Sanjana Jan ) उर्फ अंजली पाटील ( Anjali Patil Ajagar Patil ) , उर्फ अजगर पाटील या गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास आहेत. गावात राहत असताना गोरगरीब जनतेची सेवा करीत प्रत्येकाच्या मनावर राज करणाऱ्या अंजलीने निवडणूक निवडणूक रिंगणात ( Transgender become grampanchayat member ) आपली उमेदवारी दाखल करण्याचे ठरविले होते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत भादली बुद्रुक गावाची पंचक्रोशीत चर्चा होती. खरेतर अंजली यांनी वॉर्ड क्रमांक 4 मधून महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता . पण , निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन तो बाद केला. तृतीयपंथी असल्याने त्यांना महिला प्रवर्गातून उमेदवारी करता येणार नाही, असे निवडणूक अधिकाऱ्याने म्हटले. मतदार यादीतही त्यांच्या नावापुढे लिंगाचा उल्लेख ' इतर ' असा असल्याने त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. पण अंजली थांबल्या नाहीत. त्यांनी थेट उच्च न्यायालयाचाच दरवाजा ठोठावला.
गावाच्या विकासासाठी अंजलीची नेहमी धडपड-सरपंच - अंजली यांनी गावाच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य केले. नेहमीच विविध प्रश्न ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्या सोडविण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक वेळेस आमच्या हाकेला मान देत नेहमीच गावाच्या विकासासाठी धडपडत असणाऱ्या अंजली असल्याचे सरपंचांनी म्हटले आहे. राज्यातील पहिल्या तृतीयपंथी महिला ग्रामपंचायत सदस्य आमच्या भादली बुद्रुक गावात झाल्याचा बहुमान असल्याचे सरपंचांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिना निमित्त केला सत्कार -अंजली ही नेहमीच गावाच्या विकासासाठी अग्रेसर आहे. प्रत्येक वेळी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित राहून आपल्या गावाचा कशा पद्धतीने विकास करता येईल या संदर्भात ग्रामसेवक, सरपंचासह सदस्यांसोबत चर्चा करीत असते. यातूनच गावासह आपल्या वॉर्डाचा विकास साधण्याचा अंजली हिचा नेहमीच मानस असतो. यानिमित्ताने आज आंतरराष्ट्रीय तृतीयपंथी ओळख दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या आवारात अंजली पाटील हिचा ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यांच्या उपस्थितीत सत्कारही करण्यात आला.
लिंगभेद न पाहता कामांना प्राधान्य - उमेदवाराचे लिंग , जात - पात नाही, तर त्याचे काम महत्त्वाचे आहे. अंजलीने वार्डात विविध विकास कामे करून पुरुषांच्या बरोबरीने लढून गावात विकास कामाची साथ दिली आदर्श निर्माण केला आहे , अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली. मला निवडणूक लढवण्यासाठी खूप सार्या अडचणी आल्या होत्या. निवडणूक अधिकाऱ्याने माझा अर्जही बाद केला. मात्र मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता मी औरंगाबाद खंडपीठापर्यंत मजल गाठली. त्यात मला न्याय मिळाला. त्यानंतर मी निवडणुकीत विजय प्राप्त केला. मात्र त्या सोबतच मला अजगर अजित पटेल असे पुरुष म्हणून तर अंजली गुरु संजना जान स्त्री म्हणून नावे वापरण्याचे प्रमाणपत्र न्यायालयाने दिली आहेत. यामुळे मी आता दोन्ही नावाचा वापर करू शकते, अशी माहितीदेखील अंजली यांनी दिली.
निवडणूक रिंगणात उभे होण्यासाठी आल्या होत्या अनेक अडचणी...
गावात गेल्या पंधरा वर्षापासून नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणी सोडविण्याचे काम करत आहे. याच माध्यमातून मला गावकऱ्यांनी निवडणूक लढवण्यासाठी हट्ट केला. त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरली. मला नागरिकांनी निवडून दिले. त्याबद्दल मी गावकऱ्यांचे आभार मानते. माझ्या परीने काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल, असे अंजली यांनी सांगितले. विशेष म्हणजे गावात इतर वार्डापेक्षा भादली बुद्रुक गावातील वार्ड क्रमांक चार म्हणजेच अंजली हिच्या वार्डात रस्त्याची, गटारीची पाण्याची सुसज्ज अशी व्यवस्था तिने प्रशासनाच्या मागे लागून करून घेतली आहे. तर अंजली पुढील निवडणूकीत कशा पद्धतीने सहभाग घेते हे पाहणे औचित्यपूर्ण ठरणार आहे.
हेही वाचा- Covid Restrictions Revoked Maharashtra : मोठी बातमी.. राज्यात कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले..