हिंगोली - सेनगाव तालुक्यातील हाताळा आणि ताकतोडा हे दोन गावे शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी विक्रीसाठी काढले आहे. ताकतोडा हे गाव विक्रीसाठी काढून सात दिवस उलटलेत. त्यापाठोपाठ हाताळा हे गावही दोन दिवसांपासून विक्रीस काढले आहे. परंतु, अजूनही या दोन्ही गावाची प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष आपल्या मागण्यांकडे केंद्रित करण्यासाठी दोन्हीही गावातील शेतकरी संघर्ष संघटनेच्यावतीने कनेरगाव नाका येथे शनिवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास रास्ता रोको करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यात मागील तीन ते चार वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमान होत आहे. त्यामुळे शेतीतील उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर अजूनही कायम आहे. तसेच ताकतोडा येथील शेतकऱ्यांना पीक कर्ज आणि पीक विम्याची नुकसानभरपाई मिळाली नसल्याने मागील सात दिवसापासून थेट गावच विक्रीस काढले आहे. त्या पाठोपाठ आता हाताळा येथील शेतकऱ्यांनी देखील विविध मागण्यासाठी आपलेही गाव विक्रीस काढले आहे. त्यामुळे संपूर्ण पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
ताकतोडा गावातील शेतकऱ्यांच्या भेटीसाठी मागील तीन ते चार दिवसापासून अधिकाऱ्यांसह पुढाऱ्यांची रीघ लागत आहे. दोन दिवसापासून विक्रीस काढलेले हाताळा गावही आता विविध मागण्याने चांगलेच चर्चेत आले. शुक्रवारी ताकतोडा आणि हाताळा येथे शेतकरी संघर्ष समितीने शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. सात दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळेच आता शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने ताकतोडा आणि हाताळा येथील गावातील शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष केंद्रित करून घेण्यासाठी कनेरगाव नाका रास्ता रोको करणार आहे.
अकोला- हैदराबाद या महामार्गावर शनिवारी सकाळी 11 वाजता रास्ता रोको करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या दोन्ही गावाची संपूर्ण महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा रंगत आहे. यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे जिल्हा अध्यक्ष अमोल खिल्लारी, उपजिल्हाध्यक्ष सुधीर शेळके, विश्वनाथ शिरसाट, राम उदगिरे, सुनील खिल्लारे, बालाजी पारीस्कर आदींनी शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आहेत.