हिंगोली - तालुक्यातील 111 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत आज तिसऱ्यांदा जाहीर करण्यात आली. 29 जानेवारी रोजी देखील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते. मात्र आरक्षण सोडतीत तांत्रिक चुकीचे कारण सांगून, जिल्हाधिकाऱ्यांनी ही सोडत रद्द केली होती. आज पुन्हा एकदा आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान चार ग्रामपंचायती वगळता सर्व ग्रामपंचायतींमध्ये पूर्वीचेच आरक्षण कायम राहिले. मात्र ज्या ग्रामपंचायतींचे आरक्षण बदलले आहे, त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. यामध्ये करवाडी, दुर्ग, धामणी, माळधामणी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आरक्षण बदलल्याने येथील ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आरक्षण पुन्हा बदलण्याची धाकधूक
29 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आलेले आरक्षण तांत्रिक अडचणीचे कारण सांगून, काही वेळातच बदलण्यात आले होते. त्यामुळे आज काढण्यात आलेले आरक्षण पुन्हा बदलणार तर नाहीना? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. अनेकांनी याबाबत जिल्हा प्रशासनाकडे विचारणा देखील केली.
खडकत बु. गावाचे तिसऱ्यांदा आरक्षण बदलले
हिंगोली तालुक्यातील खडकत बुद्रुक ग्रामपंचायतीचे आरक्षण तब्बल तीनवेळा बदलण्यात आले. सरपंच पदासाठीचे आरक्षण सतत बदलत असल्यामुळे येथील ग्रामस्थांनी आरक्षणावर आक्षेप घेतला.
अशी आहे आरक्षणाची प्रवर्ग निहाय आकडेवारी
अनुसूचित जाती 19 पैकी 9 महिला, तसेच अनुसूचित जमाती 8 पैकी 4 महिला, ना. मा. प्र. 30 पैकी 28 महिला आणि सर्वसाधारण वर्ग 55 पैकी 28 महिला असे एकूण 111 पैकी 56 महिला सरपंच होणार आहेत.