हिंगोली - तालुक्यातील खांबाळा येथे रविवारी पहाटेच्या सुमारास तीन ठिकाणी चोरट्यांनी हात साफ केला. चौथ्या घरी डल्ला मारण्यासाठी चोरटे पोहोचले. मात्र, त्या घरचे सर्वजण जागी असल्याने चोरट्यांचा डाव फसला आणि त्या चोरट्यांनी पळ काढला. दरम्यान, याच वेळी खांबाळा गावाच्या रस्त्यावर विजेचा धक्का लागलेल्या अवस्थेत एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
हिंगोली शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या खांबाळा येथे रविवारी पहाटे दोनच्या सुमारास तीन घरांमध्ये चोरट्यांनी हात साफ केला. चौथ्या घरी डल्ला मारण्यासाठी चोरटे पोहोचले. मात्र, त्या घरातील लोकांना जाग आली आणि चोरट्यांनी पळ काढला. तेव्हा त्या घरातील लोकांनी ओरडून आजूबाजूच्या लोकांना गोळा केले.
याचदरम्यान, गावापासून जवळच असलेल्या रस्त्याच्या कडेला एक अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाजवळ विजेची तार तुटलेली होती. त्यामुळे त्या माणसाचा मृत्यू विजेचा धक्का लागून झाल्याचे स्पष्ट होते. मात्र, हा अनोळखी व्यक्ती होता तरी कोण ? याची परिसरात चर्चा रंगली आहे. मात्र, हा मृतदेह त्या चोरांच्या टोळीतील एकाचा असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
एवढा पळविला मुद्देमाल
खांबाळा येथील साहेबराव हरजी पवार यांच्या घरातील १ लाख ७५ हजार रुपयांचे ७ ग्रॅमचे कानातील झुमके, तर लहान मुलाच्या गळ्यातील २ हजार ५०० रुपयांचा १ ग्रॅमचा ओम, २४०० रुपयांचे चांदीचे ८ तोळ्याचे कडी बिंदले, ३ हजार ६०० रुपयांचे पायातील १२ तोळ्याचे चांदीचे कडे, १० हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल आणि नगदी २३ हजार रुपये असा एकूण ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
तसेच कडुजी पठाडे, रामदास आगलावे यांच्या घराचे कडी, कोंडा व कुलूप तोडून चोरट्याने हात साफ केला आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात साहेबराव पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मृत व्यक्ती हा चोरट्यांचा साथीदार होता
विजेचा झटका लागून मृत्यू झालेला अनोळखी व्यक्ती हा चोरट्यांचा एक साथीदार असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. जेव्हा या चोरट्याला विजेचा झटका लागला तेव्हा त्याचे साथीदार त्याला आवाज देत जवळ बोलवण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रकार रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घरातील महिलेने प्रत्यक्ष पाहिला असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी चोरट्यांनी हात साफ केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास केला जात आहे.
हेही वाचा- हिंगोलीत-वसमतमध्ये 'झेंडूची फुले' अभियानाला चांगला प्रतिसाद