गोंदिया - कौटुंबिक वादावरून एका व्यक्तीने स्वत:च्याच घराला आग लावल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (गुरूवारी) जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात रामाटोला येथे घडली. याप्रकरणी धनलाल रहांगडाले यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गोरेगाव तालुक्यातील रामाटोला येथील धनलाल रहांगडाले यांचा मुलगा व्यंकट रहांगडाले यानी बुधवारी रात्री घरातील सदस्यांसोबत वाद घातला. या वादाच्या भीतीने व्यंकटचे वडील धनलाल रहांगडाले, त्याचा लहान भाऊ आणि पत्नीसह इतर नातेवाईकाकडे गावाबाहेर गेले. याच दरम्यान व्यंकट याने रागाच्या भारत घराला आग लावली. आग लावण्यापूर्वी व्यंकटने गॅस सिलेंडरचा स्फोट होऊ नये म्हणून ते घराबाहेर काढुन ठेवले होते.
हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : कोरोना महामारीच्या काळात आदिवासी बांधवांना रानभाज्यांचा 'आधार'
घटनेची माहिती ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि याची माहिती कुटुंबियांना दिली. मात्र, तो पर्यंत पुर्ण घर जळुन खाक झाले होते. या घटनेत अन्नधान्य, दागिने, रोकड, कागदपत्रे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तु जळून खाक झाल्या आहेत. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. पावसाळा सुरु झाला आहे. अशा परिस्थितीत दोन भावांची कुटुंब उघड्यावर आले आहे. याप्रकरणी गोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.