गडचिरोली - विजेच्या प्रवाहाने बिबट्याची शिकार करून त्याची कातडी विक्रीसाठी तेलंगणा राज्यात गेलेल्या तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी हे अहेरी तालुक्यातील उमानूर परिसरातील आहेत. त्यांना मंचेरियाल जिल्ह्यातील चेन्नूर तालुक्यातील कोटापल्ली पोलीस स्टेशन हद्दीत त्यांना अटक करण्यात आली. तिरुपती कोंडागुर्ले, गंगाराम सडमेक आणि तुळशीराम वेलादी असे आरोपींची नावे आहेत.
सिरोंचा वनविभागातील जिमलगट्टा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मरपल्ली नियतक्षेत्रात बिबट्याची शिकार करण्यात आली. मात्र, सिरोंचा वनविभागातील अधिकाऱ्यांना या घटनेची साधी माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जवळपास 15 लाख रुपये किमतीचे कातडे असल्याची माहिती रामगुंडमचे पोलीस आयुक्त व्ही.सत्यनारायण यांनी गोदावरीखनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. अहेरी उपविभागात मागील काही वर्षांपासून वन्यप्राण्यांची शिकार करून त्याचे अवयव परप्रांतात विक्री करण्याचा प्रकार वाढला आहे. यापूर्वी सुद्धा वाघाची शिकार करून तेलंगणा राज्यात कातडी विकाणाऱ्याला गुडुर येथे अटक करण्यात आली होती. एकूणच वन्यप्राण्यांसाठी अनुकूल असलेला हा परिसर सध्या 'डेंजर झोन' ठरत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मोदींचे 'सार्क'ला आवाहन; 'या' देशांनी दर्शवली सहमती