गडचिरोली - जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 77.2 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाल्यांना पूर आला असून भामरागड-अल्लापल्ली, आरमोरी-देसाईगंज या मार्गासह 16 प्रमुख मार्ग सध्या बंद आहेत. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली आहे. आतापर्यंत तब्बल 118 टक्के पाऊस झाला आहे.
देसाईगंज तालुक्यात सर्वाधिक 212 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सलग 3 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे 4 आणि 5 सप्टेंबरला भामरागडचा संपर्क तुटला होता. काल गुरुवारी पावसाने थोडी उसंत घेतल्याने पर्लकोटा नदीचा पूर ओसरला. त्यानंतर हा मार्ग सुरू करण्यात आला होता. मात्र, काही तास उलटताच आज सकाळी परत एकदा पूर आल्याने भामरागडचा संपर्क तुटला पुन्हा आहे. तर, कुरखेडा-वैरागड, अहेरी-देवलमरी, कमलापूर-रेपनपली, आरमोरी-वडसा, शंकरपूर-बोडदा, फरी-किनाळा, एटापल्ली-आलापल्ली, अहेरी- सिरोंचा, भामरागड-लाहेरी, चातगाव-पेंढरी, मानपूर- पिसेवडदा, कोरची-गोटेकसा, धानोरा- मालेवाडा, चोप-कोरेगाव, हळदी -डोंगरगाव हे 16 मार्ग सध्या बंद आहेत.