मुंबई - शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या दादरमध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे. दादर शिवाजीपार्क चौपाटीच्या सुशोभीकरणाचे काम करण्यात आले. मात्र याचे श्रेय घेण्यावरून आता मनसे आणि शिवसेनेत राजकारण पेटले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते दादर शिवाजीपार्क चौपाटीच्या सुशोभीकरणाचे 2012 मध्ये भूमिपूजन झाले. येथील चौपाटीवर धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यास सुरुवात झाली आणि 2012 मध्येच चौपाटीच्या बंधाऱ्यावर सुशोभीकरणास सुरुवात होऊन ते पूर्ण झाले. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते या कामाच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ झाला आहे.
"पण 'मनसेला या कामाचे श्रेय मिळू नये, म्हणून मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने या बंधाऱ्यावरील सुशोभीत पदपथाच्या वापरास महापौर बंगल्याच्या सुरक्षिततेचे कारण देऊन विरोध केला. इतकेच नव्हे तर त्या जागेला कुंपणही घातले, ज्यामुळे त्या पदपथावरून चालणेसुद्धा अशक्य झाले. यामुळे इतके सुंदर काम होऊनही दादरकर या सुशोभीत पदपथावरून फिरण्याचा आनंद घेऊ शकले नाहीत. अचानक 5 वर्षांनी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी आज या कामाच्या सुशोभिकरणाच्या भूमिपूजनाचा घाट घातला. 'आयत्या बिळावर नागोबा' ही आपली वृत्ती कायम असल्याचे दाखवून दिले आहे," अशी टीका मनसेने केली आहे.
"दादर चौपाटीची होणारी धूप थांबावी व किनाऱ्याचे संवर्धन आणि सुशोभीकरण व्हावे, या उद्देशाने 2012 साली चौपाटीवर धूप प्रतिबंधात्मक बंधारा बांधण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड व स्थानिक मनसे आमदारनितीन सरदेसाई यांच्या अथक प्रयत्नानंतर सदर कामाला मान्यता मिळाली. राज ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनसुद्धा झाले. 2014 साली हा बंधारा बांधून पूर्ण झाला. मग या दादर चौपाटीला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या हेतूने नितीन सरदेसाई यांनी बंधाऱ्यावर सुशोभीकरण करण्यास सुरुवात केली. पण मनसेला या कामाचे श्रेय मिळू नये, म्हणून मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने महापौर बंगल्याला लागून असलेल्या पदपथाच्या वापरास विरोध केला. विरोध एवढा टोकाचा होता की त्यांनी त्या जागेवर कुंपणच घालून ठेवले. ज्यामुळे त्या पदपथावरून चालणेसुद्धा अशक्य झाले," अशी माहिती सरदेसाई यांनी दिली.
"2014 ऑक्टोबरमध्ये शिवसेनेचे सदा सरवणकर दादर माहीमचे आमदार म्हणून निवडून आले. खासदार म्हणूननही शिवसेनेचेच राहुल शेवाळे निवडून आले. पण मागील साडेचार वर्षात त्यांचे दादर चौपाटीकडे लक्ष नव्हते. अचानक आज जो बंधारा 2014 सालीच बांधून पूर्ण आहे, जिथे सुशोभित वॉक-वे आधीच तयार आहे, तिथे केवळ राजकीय लाभासाठी नव्याने भूमिपूजन केले जात आहे," अशी टीकाही मनसेने केली आहे.
आता निवडणुका जवळ आल्यावर यांना दादर चौपाटीची आठवण आली. आम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरा राजकीय पक्ष घेतोय याचे दुख नाही, पण मनसेला श्रेय मिळू नये, म्हणून शिवसेनेने विनाकारण गेली 5 वर्षे ह्या बंधाऱ्यावरून चालण्यास लोकांना बंदी केली होती, हे मात्र निश्चितच दुर्दैवी आहे, असे मतही नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.
दादर चौपाटी येथील आस्तित्वातील समुद्र धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची सुधारणा व सुशोभिकरणाच्या कामाचे भूमिपूजन केले. जगभरातील उत्तम संकल्पना राज्यातही राबवण्याचा शासनाचा प्रयत्न असून, या नवनवीन गोष्टींमुळे पर्यटन क्षेत्राला आणखी चालना मिळेल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.