अमरावती - शहर आणि जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातला असताना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात एकूण 90 कर्मचारी कोरोनाबाधित असल्याने विद्यापीठाच्या कामाचा सध्या बोऱ्या वाजला आहे. विद्यापीठातील जवळपास सर्वच कामकाज ठप्प असून बहूतेक विभागात शुकशुकाट आहे.
कोरोना चाचणी शिबिरात 63 जण कोरोनाबधित -
विद्यापीठ प्रशासनाच्यावतीने विद्यापीठातील एकूण 400 पूर्ण वेळ कर्मचारी आणि 250 अंशकालीन कर्मचाऱ्यांसाठी 22, 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी कोरोना चाचणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी एकूण 63 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे स्पष्ट झाले. याव्यतिरिक्त खासगी प्रयोगशाळेत चाचणी करणाऱ्या एकूण 27 जणांना कोरोनाची लागण झाली आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक अधिकारी आणि विभाग प्रमुख सुद्धा कोरोनाग्रस्त असल्याने विद्यपीठात शांतता पसरली आहे.
पदवीदान समारंभ रखडला -
2019-20 या शैक्षणिक सत्रात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना पदवीप्रदान करण्यासाठी आयोजित पदवीदान समारंभ रखडला आहे. 21 फेब्रुवारी रोजी हा सोहळा होणार होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या समारंभासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात येणार होते. मात्र, अमरावतीत कोरोनाने नव्याने तोंडवर काढल्याने विद्यापीठाला हा समारंभ रद्द करावा लागला.
NAAC ची कामेही रखडली -
गतवेळी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला NAAC चे 'अ' दर्जाचे मानांकन मिळाले होते. यावर्षी NAAC साठीची कामे सुध्दा रखडली असल्याने यावर्षी NAAC चे कसे होणार, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. NAAC चे मांनांकन मिळाले नाही, तर विद्यपीठाला कोट्यवधींच्या निधीपासून वंचित राहावे लागणार आहे.
सिनेटची बैठक अधांतरीच -
12 मार्चला सिनेटची बैठक घेण्याचे ठरले आहे. गेल्यावेळी कुलगुरूंनी कोरोनाचा प्रभाव नसतानाही ही बैठक ऑनलाईन घेतली होती. यावेळी कोरोनाचा मोठा फटका विद्यपीठाला बसला असून अनेक महत्त्वाचे अधिकारी कोरोनाबधित असल्याने 12 मार्चला होणारी बैठक अधांतरीच आहे. कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांचा कार्यकाल तीन महिन्याने संपणार असून त्यांच्या काळातली सिनेटची अखेरची बैठक अतिशय महत्त्वाची आहे. आता ही बैठक 12 मार्चला होणार की नाही, हे अस्पष्ट आहे.
विद्यापीठ 10 दिवस बंद करण्याची मागणी -
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्यावतीने विद्यापीठ सलग 10 दिवस बंद ठेवण्याची मागणी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. विद्यापीठात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विद्यापीठ बंद ठेवणे, हा योग्य पर्याय आल्याचे विद्यापीठ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आणि सिनेट सदस्य अजय देशमुख यांनी 'ई टीव्ही भारत' शी बोलताना म्हटले आहे.
परीक्षा पुन्हा लांबणीवर -
कोरोनामुळे विद्यापीठाचे काम पूर्णतः खोळंबले आहे. विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभागासह विद्यपीठाशी संलग्नित अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम आणि बुलडाणा या पाचही जिल्ह्यातील महाविद्यालय बंद असून यावर्षीही गतवर्षी प्रमाणे परीक्षा लांबणीवर जाण्याचे आणि निकालही उशिरा लागण्याचे चित्र आहे.
हेही वाचा - दक्षिण आफ्रिकेतून औषध आणून देण्याच्या नावाखाली रुग्णाला दिली पिठी साखर