अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे तसेच जामखेड तालुक्यातील रेडेवाडी फाट्यावर आढळलेल्या मृत कावळ्याचा अहवाल हा बर्डफ्लू पोझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात बर्डफ्लूचे आगमन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील काही गावांत कोंबड्यांचा मोठ्या संख्येने मृत्यू होत आहेत मात्र त्याचे अहवाल येणे बाकी आहे.
जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी, जामखेड तालुक्यातील मोहा, नगर तालुक्यातील बाराबाभळी, आठवड आणि निंबळक या ठिकाणी शेकडो कोंबड्यांचा मृत्यू बर्डफ्लू सदृश आजाराने झाल्याने पक्षीपालक आणि नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे. पक्षी पालकांचे सध्या मोठे नुकसान होत असून प्रशासनाने आणि पशु संवर्धन विभागाने तातडीने पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होऊ लागली आहे. पशु संवर्धन विभाग माहिती देऊनही तातडीने दखल घेत नसल्याचा आरोप पक्षीपालक करत आहेत.
प्रशासनाकडून अलर्ट जारी-
जिल्हा प्रशासनाकडून सध्या मरतुक झालेल्या ठिकाणी दहा किलो मीटर परिसरात अलर्ट झोन घोषित केला असून अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत. पक्ष्यांची विक्री, वाहतूक, प्रदर्शन, जत्रा-बाजार या गोष्टींना प्रतिबंध करण्यात आला आहे. मृत पक्षांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. दरम्यान मिडसांगवी इथे मरतुक झालेल्या कोंबड्यांचा अहवाल हा निगेटिव्ह आल्याने तेथील अलर्ट झोन काढून घेण्यात आला आहे.