नवी दिल्ली - कोरोनामुळे मार्चपासून स्थगित असलेल्या क्रीडा उपक्रमांना हळूहळू सुरुवात होत आहे. भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी क्रिकेटच्या लवकर पुनरागमनाविषयी मत दिले आहे. ऑक्टोबरपर्यंत क्रिकेट खेळणे हे सुरक्षित असणार नाही, असे गावस्करांनी सांगितले.
गावस्कर म्हणाले, 'पुढील महिन्यात इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यामधील जैव-सुरक्षित वातावरणामधील कसोटी मालिका एक चांगले उदाहरण असेल. परंतु, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ज्या वेगाने वाढत आहे, त्या दृष्टीने क्रिकेट खेळणे अवघड असल्याचे दिसते. आपल्याकडे सर्वजण सोशल डिस्टन्सिंगचे पालन करतात. डॉक्टरांनी याविषयी सावधगिरी बाळगली आहे. परंतु, विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे.'
ते पुढे म्हणाले, 'जशी चाचणी घेण्याचा वेग वाढतो आहे, तसाच कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे मला असे वाटते की, पुढील दोन महिने क्रिकेट खेळणे सुरक्षित असणार नाही. कदाचित ऑक्टोबरपर्यंत क्रिकेट खेळणे अवघड असेल.
चीनच्या वुहान शहरातून आलेल्या या विषाणूने जगाच्या गतीला ब्रेक लावला आहे. भारतालाही या विषाणूचा मोठा फटका बसला आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये पहिल्यांदाच नव्या रुग्णांनी 11 हजाराचा आकडा पार केला. देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांजवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 11 हजार 458 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 386 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.