मुंबई - सध्या टेलिव्हिजन मालिकांना सुगीचे दिवस आल्यासारखे वाटते. गेल्या वर्षी काहीही नवीन देऊ न शकल्यामुळे मराठी वाहिन्या आता एकापाठोपाठ नवीन मालिका घेऊन येताहेत. मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी लवकरच एक दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे ‘स्वाभिमान’. अस्तित्वाचा शोध घेऊ पहाणाऱ्या हरहुन्नरी पल्लवीची गोष्ट या मालिकेतून पाहायला मिळेल. एका छोट्या गावात वाढलेल्या पल्लवीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न आहे. स्वप्नांचा पाठलाग करत ती तिचं ध्येयं कश्या पद्धतीने गाठते याची रंजक गोष्ट ‘स्वाभिमान’ मालिकेतून उलगडेल.
स्वाभिमान मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘ माणसाने स्वाभिमानी असावं ती त्याची ओळख असते. स्वाभिमान हा एका मुलीच्या, बाईच्या आयुष्यातला दागिना आहे जो तिने अभिमानाने मिरवायला हवा. स्वाभिमान हे तिचं अस्तित्व आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते कधीही हरवता कामा नये हे या मालिकेतून रसिकांना पाहायला मिळेल.’
‘स्वाभिमान’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करणारी पूजा बिरारी ही पल्लवी ची व्यक्तिरेखा साकारत आहे. तसेच सर्वांचा लाडका अभिनेता अक्षर कोठारी, आसावरी जोशी, अशोक शिंदे, सुरेखा कुडची, प्रसाद पंडित हे कलाकार विविध व्यक्तिरेखा साकारताना दिसतील.
‘स्वाभिमान’ ची निर्मिती फ्रेम्स प्रोडक्शनने केली असून कल्पेश कुंभार दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. नवी मालिका ‘स्वाभिमान’ २२ फेब्रुवारीपासून स्टार प्रवाहवर प्रसारित होणार आहे.
हेही वाचा - 'शार्दुल’ आणि ‘सुमी’ ला नेहमीच इच्छा होती चित्रपटातून एकत्र काम करण्याची!