ठाणे - कोरोनाकाळात राज्याची आणि देशाची आर्थिक परिस्थिती हलाखिची झाली होती. ही परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात कपात (Stamp duty Department) केली होती. त्याची मुदत संपल्यावर आता एक टक्का वाढ होणार आहे. त्यामुळे मार्च महिन्यात विक्रमी दस्त नोंदवत 555 कोटी 14 लाख 35 हजार 900 रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. नव्या आर्थिक वर्षात मुद्रांक शुल्क विभागाकडून एक टक्का वाढ होणार आहे. त्यामुळेच ही कमाई झाल्याचे समोर आले आहे.
एका महिन्यात मिळवलेल्या या उत्पन्नात ठाणे शहर आणि ठाणे ग्रामीन विभागाचा समावेश आहे. ठाणे शहरातील बाळकूम, मासुंदा तलाव, भाईंदर, वाशी, सीबीडी, कोपरखैरणे, कळवा, मिरा रोड, नेरूळ या बारा कार्यालयांमध्ये मार्च महिन्यात एकूण 14013 दस्तांची नोंदणी झाली आणि या दस्त्यामुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी फी मिळून 440 कोटी 8 लाख 38 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यासोबत ठाणे ग्रामीण भागात उल्हासनगर, भिवंडी, मुरबाड आणि शहापूर येथील 9 कार्यालयामधून 7800 दस्त नोंदणी करून, त्यातून 115 कोटी पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
एक टक्का एलबीटी हा मेट्रो सेस म्हणून उत्पन्न - ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील आडगाव कल्याण महापालिका क्षेत्रात समाविष्ट असून त्यांना एक टक्का एलबीटी हा मेट्रो सेस म्हणून आहे. तसेच संपूर्ण कल्याण महापालिकेचा एलबीटी लागू असला तरी तिचा एक भाग मेट्रो स्टेशन अंतर्गत येत असल्याचे मुद्रांक शुल्क अधिकार्यांनी सांगितले आहे.
एक टक्का जातो लाखाच्या घरात - मार्च अखेरीस राज्य सरकारचा सवलतीचा एक टक्का कमी होत असून, यामुळे अनेकांनी या काळात आपले दस्त नोंदणी कृत केले. त्यामुळे लाखो रुपयांची सूट ग्राहकांना मिळाली आणि याचाच फायदा घेत या काळात मोठ्या प्रमाणात दस्त नोंदणी झालेली आहे. यामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नात भर देखील पडलेली आहे.