मुंबई - शिवाजी पार्क येथील मनसेच्या गुढीपाडवा मेळव्यात राज ठाकरे यांनी मशीद, मदरसेमध्ये समाज विघातक गोष्टी घडत असल्याचा गंभीर आरोप केला होता. वंचित प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी याबाबत संतप्त भूमिका मांडताना, राज ठाकरे यांच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी केली आहे. (Raj Thackeray vs Rekha Thakur) त्यामुळे आगामी काळात मनसे आणि वंचित असा वाद रंगण्याची शक्यता आहे.
सरकारकडून टीकेची झोड उठली आहे - गुढीपाडव्याला शनिवार(दि. 2 एप्रिल)रोजी शिवाजी पार्क येथील मैदानात राज ठाकरे यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. भाजपच्या मशिदीवरील भोंगे काढण्याच्या मागणीचे समर्थन केले. मशीद आणि मदरशांमध्ये समाज विघातक गोष्टी घडत असल्याचाही यावेळी आरोप केला. या भाषणानंतर राज ठाकरेंवर महाविकास आघाडी सरकारकडून टीकेची झोड उठली आहे. वंचित बहूजन आघाडीने देखील राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा - सोमवारी सुजात आंबेडकर यांनी मशिदीवरील भोंगा काढण्यासाठी अमित ठाकरे यांना पाठवा आणि त्यांना हनुमान चालीसा म्हणायला सांगा, असे आव्हान देऊन राज ठाकरे यांना डिवचले होते. वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी राज ठाकरेंना अटक करण्याची मागणी केली आहे. त्या म्हणाल्या की, राज ठाकरे यांचे स्त्रोत तपासून ज्या मशीन अथवा मदरशांमध्ये समाजविघातक कृत्य घडत आहेत. तेथे चौकशी करावी आणि काही तथ्य आढळल्यास त्यांना जबाबदार धरून मशीद, मदरसे समितीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. मात्र, तसे काही तथ्य आढळून आले नाही तर समाजामध्ये दहशत विद्वेष पसरवणाऱ्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्या यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.
हेही वाचा - Adar Poonawalla Pune : 'कोरोनाची चौथी लाट आली, तर ती सौम्य असेल'