मुंबई - मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या सत्ता काळात मित्र पक्ष असलेल्या भाजपाने राज्यात सत्ता समीकरणे बदलल्यावर पालिकेत विरोधाची भूमिका घेत विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला. त्यासाठी भाजपाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने काँग्रेसच्या बाजूने निकाल दिल्याने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने भाजपाची याचिका आज फेटाळून लावल्याने महापालिकेतील विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने भाजपाला मोठा दणका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपा पाहरेकरी -
मुंबई महापालिकेत गेल्या 25 वर्षाहून अधिक काळ शिवसेनेची सत्ता आहे. या दरम्यान भाजपा आणि शिवसेनेची युती होती. मात्र 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस राज्यात मुख्यमंत्री होताच भाजपा आणि शिवसेनेने पालिकेची 2017 ची निवडणूक वेगवेगळी लढवली. शिवसेनेला 84 तर भाजपाला 82 नगरसेवक निवडून आणता आले. महापौर पदासाठी शिवसेनेने उमेदवार उभा केला असता भाजपाने त्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्याचवेळी आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाही, कोणत्याही पदावर दावा करणार नाही, पहारेकऱ्याची भूमिका पार पाडू असे भाजपाकडून जाहीर करण्यात आले होते. महापौर पद शिवसेनेकडेच राहावे म्हणून बहुमतासाठी अपक्ष नगरसेवकांना सोबत घेतले तसेच मनसे 6 नगरसेवक फोडून आपल्या पक्षात प्रवेश दिला.
विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडे -
महापौर पदासाठी शिवसेनेला पाठिंबा देताना भाजपाने कोणत्याही पदावर दावा करणार नसल्याचे जाहिर केल्याने विरोधी पक्ष नेते पद तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसकडे देण्यात आले. विरोधी पक्ष नेतेपदी रवी राजा यांची 2017 मध्ये नियुक्ती करण्यात आली. राज्यात मागील वर्षी विधानसभा निवडणुका झाल्या. त्यात भाजपा आणि शिवसेनेची युती तुटली. शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांच्या सोबत जाऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर पालिकेत भाजपाने विरोधात बसण्याचे जाहिर केले. भाजपाने विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला. महापौरांनी या विरोधात निकाल देत पालिकेच्या नियमाप्रमाणे भाजपाला हे पद देता येत नसल्याचा निकाल दिला. या निकालाला भाजपाने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सप्टेंबरमध्ये या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने दिला. भाजपाचा विरोधी पक्ष नेते पदाचा दावा फेटाळण्यात आला. काँग्रेकडेच विरोधी पक्ष नेते पद राहणार हे स्पष्ट झाल्याने भाजपाने सर्वोच्च न्यायालयाने धाव घेतली होती. आज सर्वोच्च न्यायालयानेही भाजपाची याचिका फेटाळून लावली आहे. यामुळे विरोधी पक्ष नेते पद काँग्रेसकडेच राहणार हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान याप्रकरणी फेरविचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती भाजपा गटनेते प्रभाकर शिंदे यांनी सांगितले.
पालिकेचा नियम काय -
पालिकेत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपाने विरोधी पक्ष नेते पद घेण्यास नकार दिला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाच्या काँग्रेसला विरोधी पक्ष नेते पद देण्यात आले. एखाद्याला हे पद दिले असता त्या पदावरील व्यक्ती राजीनामा देत नाही, त्या पदावरील दावा सोडत नाही किंवा त्याचा मृत्यू होत नाही तो पर्यंत त्या पदावर दुसरा विरोधी पक्ष नेता निवडता येत नाही. सध्या काँग्रेसचे रवी राजा विरोधी पक्ष नेते आहेत. त्या पदावर भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दावा केला होता. पालिकेच्या महासभेत म्हणजेच सभागृहात महापौरांनी भाजपाला विरोधी पक्ष नेते पद देण्यास नकार दिला. त्याविरोधात भाजपाने उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा दोन्ही न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यामुळे हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले आहे.