मुंबई - रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे राष्ट्रवादीचे आमदार अवधूत तटकरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आज शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तटकरे कुटुंबीयांनी मातोश्रीवर शिवबंधन बांधले.
गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्त्यांशी पक्ष बदलण्यासंदर्भात चर्चा सुरू होती. तसेच अजित पवार यांच्याशीही पक्ष सोडण्यापूर्वी एकदा चर्चा केल्याचे अवधूत तटकरे यांनी सांगितले.
माझ्या व्यथा अजित दादांकडे मांडल्या होत्या. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपण भेटून बोलू असे म्हटले होते, मात्र पक्ष बदलाच्या निर्णयापर्यंत मी पोहचलो होतो, अशी प्रतिक्रिया अवधूत तटकरे यांनी शिवसेना पक्षप्रवेशावर दिली.
हेही वाचा रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, अवधूत तटकरे आज बांधणार शिवबंधन
मी कोणावरही नाराज नसून, आमचे कुटुंब राजकारणात असल्याने मला राजकीय महत्वकांक्षा असणे स्वाभाविक असल्याचे ते म्हणाले. तसेच मला तिकीट मिळणार म्हणून मी पक्षात आलेलो नाही. काकांशी काहीही बोलणे झालेले नसल्याचेही अवधूत तटकरे यांनी सांगितले.