मुंबई - दिवसेगणिक मुंबई व परिसरात वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता शासनाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. उद्यापासून एक आठवडाभर मुंबई व नवी मुंबई परिसरातील भाजीपाला मार्केट 1 आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योग, मत्स्यसंवर्धन व बंदरविकास आणि मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली.
राज्य शासनाने लॉकडाऊननंतरही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजी मार्केट उघडी ठेवली आहेत. मात्र भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येतेय. त्यानंतर मुंबई पालिकेने मोकळ्या मैदानात भाजी मार्केट स्थलांतर केले. तरीही तिचं स्थिती पाहायला मिळतेय. या आठवड्यात मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच मुंबईत कोरोना रुग्ण आढळलेल्या हॉटस्पॉट भागात कर्फ्यु लावण्यात येणार आहे. त्या परिसराचे मॉनिटरिंग पोलिसांमार्फत करण्यात येणार आहे. तशा सूचना पोलीस आयुक्तांना करण्यात आल्याचे असलम शेख यांनी सांगितले.