मुंबई - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज्यसभा निवडणुकीत फटका बसला, तसाच विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेला फटका बसणार असल्याची टीका राणा दाम्पत्याने आज मुंबईत केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांची राणा दाम्पत्याने भेट घेतल्यानंतर ते माध्यमांसोबत बोलत होते.
महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी -मागील अडीच वर्षाच्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने कुठलीच कामे केली नाहीत. जनतेच्या विशेष करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले असून मुख्यमंत्री बांधावर कधी पोहोचणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
विधानसभेतही चालणार फडणविसांची जादू - विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला निवडणूक होत असून भाजपने या निवडणुकीत पाच उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. हे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील. महाविकास आघाडीला मोठा झटका बसेल, असेही रवी राणा म्हणाले. तसेच विधानपरिषदेत फडवणीस यांची जादू पहायला भेटेल. या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना मोठा फटका बसेल अशी रणनीती तयार झालेली असल्याचेही रवी राणा यावेळी बोलताना म्हणाले.