मुंबई - परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कथित पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी मासिक उद्दिष्ट दिल्याचा आरोप केल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तथा जलसंपदा मंत्री यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर परमबीर सिंग यांच्या पत्रावर फोनवरून चर्चा केली आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष भाजपने गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
सद्यस्थितीची माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सांगण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या विविध नेत्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
संबंधित बातमी वाचा-युपीएचे नेतृत्व शरद पवारांनी करावे - संजय राऊत
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकार वाचवण्यासाठी परमबीर सिंग यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करू नये. त्यांनी सादर केलेला चॅट हा सर्वात मोठा पुरावा आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नैतिक भूमिका घेऊन कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे. या प्रकरणावरून आता राज्यातील वातावरण तापले आहे.
काय म्हटले आहे परमबीर सिंग यांनी पत्रात?
परमबीर सिंग यांनी लिहिलेल्या कथित पत्रात आरोप केलेला आहे की मुंबई पोलीस खात्यामध्ये पुन्हा सामावून घेण्यात आलेल्या सचिन वाझे या अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर बोलावून घेतले होते. या दरम्यान त्यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते की मुंबईत 1, 750 बार असून प्रत्येक बारकडून 2 ते 3 लाख रुपयांची वसुली दर महिन्याला केल्यास 40 ते 50 कोटी रुपयांचा टार्गेट हे पूर्ण केले जाऊ शकते. उरलेले 50 कोटींच्या टार्गे साठी इतर माध्यमातून प्रयत्न करावा लागेल, असे सांगून दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास त्यांना सांगण्यात आल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. यासंदर्भात परमबीर सिंग यांनी मला येऊन सांगितले असता याबद्दलची माहिती मला मिळाली असल्याचा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.
![Paramveer Singhs letter to CM](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11090691_1.jpg)
![Paramveer Singhs letter to CM](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11090691__3.jpg)
![Paramveer Singhs letter to CM](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11090691_2.jpg)
![Paramveer Singhs letter to CM](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11090691_4.jpg)
हेही वाचा-मनसुख हिरेन प्रकरणाचे गुढ वाढले; हिरेन यांच्या मृत्यू ठिकाणी आढळला आणखी एक मृतदेह
गृहमंत्र्यांनी फेटाळले आरोप-
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पोलीस आयुक्त सिंग यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करून म्हटले की, परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाईपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस -
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना कथित पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्री यांनी 100 कोटी रुपयांचे महिना टार्गेट सचिन वाझे यांना दिले होते, असा आरोप माजी पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. दरम्यान, हा प्रकार मुंबई पोलीस दलाची मान खाली घालणारा आहे. या परिस्थितीत गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावाच आणि केंद्रीय तपास यंत्रणेकडून या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.