मुंबई - राज्यातून भाजपची सत्ता गेल्यापासून शिवसेनेला टार्गेट करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावर भाष्य केले. बाळासाहेबांच्या जीवावर मोठे झाले तेच आरोप करत आहेत, हे तर आमचे दुर्दैव आहे, अशी खंत सामंत (Uday Samant criticizes BJP) यांनी व्यक्त केली.
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी पार्क येथील स्मृती स्थळावर अभिवादन करण्यासाठी सामंत आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
राज्यात शिवशाहीचे सरकार आले पाहिजे, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवत आहोत. विरोधक यावरून टीका करत आहेत. जे टीका करतात, त्यांचे अस्तित्व आम्ही नगरपंचायतीच्या निवडणुकीत दाखवून दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर टीका केली जात आहे. पण आमची ती संस्कृती नाही. बाळासाहेंबांनी आम्हाला ते शिकवले नाही. बाळासाहेंबामुळे जे मोठे झाले तेच आज टीका करतात, हेच आमचे दुर्दैव आहे, असे सामंत म्हणाले.
एमपीएससी परीक्षेचे पेपर फुटी प्रकार वाढले आहेत. आजही पेपर फुटण्याचा प्रकार घडल्याचे समजते. मात्र या प्रकरणी संबंधित विभागाला लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांना आदेश -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ बंद ठेवली आहेत. सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता महाविद्यालय, विद्यापीठ सुरू होणार का याकडे लक्ष लागले असताना, येत्या 5 दिवसांत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांना तसे आदेश दिल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.