मुंबई : राज्य सरकारने लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात असे मुंबई उच्च न्यायालयाने सुचवले आहे. अनलॉक-५ मध्ये बऱ्यापैकी सर्व प्रकारचे व्यवसाय-उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या लोकल रेल्वेंमध्ये गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने सरकारला लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचे सुचवले. न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि जी. एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने याबाबत निर्देश दिले.
सध्या अनलॉक-५मध्ये शहरातील मॉल्स, हॉटेल्स सुरू करण्यात आले आहेत. सरकारी कार्यालयेही १०० टक्के उपस्थितीसह सुरू करण्यात आली आहेत. यासोबतच इतर उद्योगही सुरू झाले आहेत. या मागणीनुसार रेल्वे गाड्यांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. त्यामुळेच लोकलमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी गाड्यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले.
न्यायालयात रेल्वेशी संबंधित विविध याचिकांवर सुनावणी सुरू होती. यावेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. सेंट्रल मार्गावार गाड्यांची संख्या वाढवून ६०० आणि हार्बल लाईनवर ७०० करावी असेही न्यायालयाने सुचवले आहे.