अमरावती - माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख काँग्रेसमध्ये परतणार असून 19 जूनला मुंबईच्या टिळक भवन येथे आयोजित सोहळ्यात ते काँग्रेसमध्ये अधिकृतरित्या प्रवेश घेणार आहेत. डॉ. सुनील देशमुख यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली असताना देशमुखांमुळे काँग्रेसला विदर्भात दमदार नेता मिळणार आहे.
हेही वाचा - वरूडमध्ये वंचितचे घेराव आंदोलन; आंदोलकांना पोलिसांकडून अटक
नाना पटोले यांनी घेतली डॉ. सुनील देशमुखांची भेट
11 जून रोजी अमरावतीत मुक्कामी असणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. सुनील देशमुख यांची भेट घेतली होती. 11 जूनच्या रात्री शहरातील एका व्यक्तीकडे नाना पटोले आणि डॉ. सुनील देशमुख या दोघांना जेवण होते. यावेळीच डॉ. सुनील देशमुख यांचा कांग्रेस प्रवेश निश्चित झाला. नाना पटोले आणि मी चांगले मित्र आहोत. 1999 मध्ये मी आणि नाना पटोले दोघेही पहिल्यांदा निवडून आलो. तेव्हापासून आमची मैत्री आल्याचे डॉ. सुनील देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून राजकारणात प्रवेश
1979 मध्ये एनएसयूआयचे अध्यक्ष म्हणून डॉ. सुनील देशमुख यांचा राजकारणात प्रवेश झाला. अमरावती शहर आणि जिल्ह्यात काँग्रेसची बांधणी करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा राहिला आहे. 1999 मध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यावर त्यांनी भाजपचे जगदीश गुप्ता यांचा पराभव केला होता. 1999-2004 पर्यंत ते विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष होते. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झाल्यावर डॉ. सुनील देशमुख यांना राज्यमंत्री पद मिळाले होते.
2009 मध्ये काँग्रेसमधून हकालपट्टी
2009 मध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा मुलगा रावसाहेब शेखावत यांची मुंबईवरून अमरावतीच्या राजकारणात अचानक एन्ट्री झाली आणि काँग्रेसने 2009 मध्ये रावसाहेब शेखावत यांना उमेदवारी दिली. डॉ. सुनील देशमुख यांनी पक्षच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याने त्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली.
2009 मध्ये काँग्रेस विरोधात लढवली निवडणूक
काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर डॉ. सुनील देशमुख यांनी जन विकास काँग्रेस पक्ष म्हणून स्वतंत्र पक्ष स्थापन केला आणि काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत डॉ. सुनील देशमुख यांचा साडेसहा हजार मतांनी पराभव झाला होता.
2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश
2014 ची विधानसभा निवडणूक जवळ येईपर्यंत काँग्रेस यावेळी आपल्याला उमेदवारी देईल, अशी आशा डॉ. सुनील देशमुख यांना होती. मात्र, काँग्रेसने पुन्ह रावसाहेब शेखावत यांना संधी दिल्याने डॉ. सुनील देशमुख यांनी भाजपात प्रवेश करून भाजपचे उमेदवर म्हणून निवडणूक लढवली. या निवडणुकीत डॉ. सुनील देशमुख यांनी रावसाहेब शेखावत यांचा 35 हजार मतांनी पराभव केला. यानंतर 2017 ला झालेल्या महापालिका निवडणुकीत 45 नगरसेवक निवडून आणून त्यांनी महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविला.
2019 मध्ये पुन्हा पराभव
2019 च्या विधानसभा निवडणुकीत डॉ. सुनील देशमुख यांना काँग्रेस आपल्याला परत बोलावणार, अशी अपेक्षा होती. राबसाहेब शेखावत यांनी ऐनवेळी निवडणूक लढवणार नाही, असे स्पष्ट केल्याने काँग्रेसकडे उमेदवार नव्हता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत काँग्रेससाठी असणाऱ्या अमरावती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेऊन उमेदवारी मिळविली. यामुळे पुन्हा भाजपचे उमेदवार म्हणून डॉ. सुनील देशमुख निवडणूक रिंगणात उतरले, मात्र काँग्रेसच्या उमेदवार सुलभा खोडके यांनी त्यांचा पराभव केला. गत दोन वर्षांपासून शांत असणारे डॉ. सुनील देशमुख पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार असल्याने अमरावतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
भाजपबाबत नाराजी नाही
माझे विचार मुळात काँग्रेसचे आहेत. कोणत्या परिस्थितीत मला भाजपची उमेदवारी घ्यावी लागली हे सगळ्यांना ठाऊक आहे. भाजपमध्ये माझी कोणावरही नाराजी नाही. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे माझे चांगले मित्र आहेतच. 1978 पासून मी काँग्रेसमध्ये होतो. आता परत मी माझा विचारांच्या पक्षात परततो आहे. मी माझ्या कोणत्याही कार्यकर्त्याला किंवा विद्यमान कोणत्याही नगरसेवकाला भाजप सोडा आणि माझ्यासोबत चला, असे म्हणणार नाही. काल ज्या पक्षात होतो त्यांना सोडताच दुसऱ्याच दिवशी त्यांच्या विरोधात बोलणे, हा माझा स्वभाव नसल्याचे डॉ. सुनील देशमुख यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, दोन तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांनी घेतले ताब्यात