मुंबई - एकीकडे सरकारने परीक्षा रद्द केल्याची घोषणा केली असली तरी मुंबई विद्यापीठाने मात्र, विद्यार्थ्यांकडून परीक्षा फी वसूली सुरू ठेवली आहे, ती तात्काळ थांबवा. उलट परीक्षा रद्द झाल्या असून विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत द्या, अशी मागणी भाजपा नेते व माजी शिक्षणमंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज कुलपती म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्राद्वारे केली आहे.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सरकारने विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या. मात्र, परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांकडून घेतले जात आहे. मुंबई विद्यापीठाने सर्व कॉलेजना याबाबतचे आदेश निर्गमित केले असून कॉलेजने जमा केलेली फी विद्यापीठाकडे जमा करावी, असे निर्देश दिले आहेत. सरकारकडून विद्यार्थ्यांची छळवणूक सुरू आहे. ही बाब अन्यायकारक असल्याचे उघड करत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिले.
पत्रात शेलार यांनी, जर परीक्षा रद्द झाल्या तर परीक्षांची फी विद्यार्थ्यांकडून का घेताय ? उलट प्रवेशाच्या वेळी ही परीक्षा फी जर कॉलेजने घेतली असेल तर ती आता विद्यार्थ्यांना परत करा, अशी मागणी केली.