मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिलला होणार आहे. या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. निवडणुकीच्या ४८ तास आधी प्रचार थांबवण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात १३ राज्यांतील ९७ मतदारसंघांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
दुसऱ्या टप्प्यात आसाम (५), बिहार (५), छत्तीसगड (३), जम्मू-काश्मीर (२), कर्नाटक (१४), महाराष्ट्र (१०), मणिपूर (१), ओडिशा (५), तमिळनाडू (३९- सर्व), त्रिपुरा (१), उत्तर प्रदेश (८), पश्चिम बंगाल (३), पुदुच्चेरी (१) या १३ राज्यांत १८ तारखेला मतदान होईल. यासाठी एकूण १ हजार ६४४ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत.
आसाममधील आसाम गण परिषदेने भाजपशी तोडलेली युती पुन्हा केली आहे. त्यामुळे युती बळकट असली तरी, नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून येथील राजकारण तापले आहे. त्यामुळे भाजपच्या अजेंड्याला विरोध करणाऱ्या पक्षांना काही प्रमाणात संधी आहे. बिहारमध्ये भाजप आणि सत्ताधारी जेडीयूची युती भक्कम आहे. तर, आरजेडी आणि काँग्रेसने दुसऱ्या बाजूला मोट बांधली आहे. कर्नाटकच्या विधानसभेत भाजपला अधिक मते मिळाली असली तरी, तेथे जेडीएस आणि काँग्रेसच्या आघाडीचे राज्य सरकार आहे. येथे लोकसभेची तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपने ममता सरकारविरोधात जोरदार प्रचार केला आहे. मात्र, सध्या तरी तृणमूल काँग्रेस अधिक भक्कम स्थितीत असल्याचे चित्र आहे.
गुन्हेगार उमेदवार -
दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारांमध्ये ११ टक्के उमेदवार हे गंभीर गुन्हेगार तर, १६ टक्के उमेदवारांवर सामान्य गुन्हे दाखल आहेत. काँग्रेसच्या ३२ टक्के उमेदवार, भाजपच्या २० टक्के आणि बसपच्या १३ टक्के उमेदवार हे गंभीर गुन्हेगार आहेत. डीएमकेचे २९ टक्के उमेदवार आणि एआयएडीएमकेचे १४ टक्के उमेदवार आणि शिवसेनेच्या ९ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.