नागपूर : "देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंचा सन्मान करत होते, देवेंद्र फडणवीस त्यांचे लहान भाऊ सारखे काम करत होते. आता महाविकास आघाडीमध्ये त्यांचे काय हाल झाले आहेत. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती केली आहे. ते उद्धव ठाकरेंना घरी बोलवतात, काँग्रेस त्यांना दिल्लीला बोलवतं. उद्धव ठाकरेंची महाविकास आघाडीची उपयोगिता संपलेली आहे," असा टोला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. ते नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरेंबद्दल वाईट वाटतं : देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंचे लहान भाऊ असल्यासारखं काम करायचे. आता मविआमध्ये त्यांचे काय हाल झाले आहेत. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची काय परिस्थिती केली आहे, ते उद्धव ठाकरेंना घरी बोलवतात. काँग्रेस त्यांना दिल्लीला बोलवतं. उद्धव ठाकरे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करा. मला उद्धव ठाकरेंबद्दल वाईट वाटतं. आम्ही त्यांना मानसन्मान दिला, मात्र त्यांनी सर्व माती केली. महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांना कधीच मुख्यमंत्री करणार नाहीत. 2019 मध्ये त्यांना महायुती फोडायची होती, म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं," असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
संजय राऊतांवर टिका : उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झालीय. मध्यप्रदेश सरकारनं सुरू केलेली 'लाडकी बहीण योजना' ही बंद पडली असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. त्यांचा दावा खोटा असल्यानं मध्यप्रदेश भोपाळ येथं संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, "संजय राऊत खोटारडेपणा करतात. मध्यप्रदेश सरकारनं 1 कोटी 30 लाख महिलांना योजना सुरळीत सुरू आहे, असं तिथल्या मुख्यंत्र्यांनी माहिती दिलीय. संजय राऊत यांनी काँग्रेस शासित राज्य कर्नाटक, हिमाचल, तेलंगणा बद्दल बोललं पाहिजे. महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीचा खोटारडेपणा उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. महाविकास आघाडीला जनताधडा शिकवेल व लाडक्या बहिणीच महाविकास आघाडीच्या नेत्यांना झोडपून काढणार."
मेरिटच्या आधारे उमेदवारी दिली जाईल : भाजपा जातीपातीचं व धर्माचं राजकारण करत नाही. हिंदुत्वाची भूमिका आमची प्रखर आहे. आमच्यासाठी हिंदुत्व महत्त्वाचं आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत हिंदुत्वाशी कॉम्प्रोमाइज करणार नाही. या देशात राहून बांगलादेश व पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्यांशी आम्ही कधीही जुळवून घेणार नाही. या देशाच्या प्रत्येक हिंदू बांधवाशी आमची बांधिलकी आहे. उमेदवारांचा निर्णय जातीपातीच्या आधारावर होणार नाही. मेरिट व कार्यक्षमतेच्या आधारे उमेदवारी दिली जाईल."
नाना पटोलेंना मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न : "मविआच्या नेत्यांचा खोटारडेपणा मतदार नोव्हेंबर महिन्यात उध्वस्त करणार. राहुल गांधी म्हणाले होते की, आमचे खासदार निवडून द्या आणि खटाखट निधी घ्या, ते खोटं निघाले. आरक्षणाबाबतही राहुल गांधी खोटं बोलले. त्यामुळं नाना पटोले यांनी वास्तविकतेचं भान ठेवावं. त्यांना आता मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडत आहे. नाना पटोले जागे व्हा. महाराष्ट्राला डबल इंजिन सरकार हवं आहे, तुमचं सरकार कधीही येणार नाही.
हेही वाचा