मऊगंज (मध्यप्रदेश) - हातापायानं अगदी धडधाकट असलेली माणसं जीवनात खचलेली, निराश झालेली आपण पाहिली असतील. मात्र, दिव्यांग असलेल्या या कृष्ण कुमारला बघा, त्याला दोन्ही हात नाहीत. पण हात नसले म्हणून काय झाले, पाय आहेत की, नशीब बदलायला. बारावीच्या परीक्षेत त्यानं ५०० पैकी ४१४ गुण मिळवून ना केवळ अपंगत्त्वालाच हरवलं तर यशाला गवसणी घालण्यात अपंगत्व आड येत नसल्याचे दाखवून दिले.
मऊगंजच्या उत्कृष्ट शाळेत पहिल्या १० गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कृष्ण कुमारनं आपलं नाव मिळवलंय. शाळेत जाण्यासाठी त्याला रोज १० किलोमीटर चालत जावं लागतं. एखाद्या हातानं लिहिणाऱ्याला लाजवेल असं पायात पेन पकडून तो अतिशय चांगल्या पद्धतीनं लिहितो. लिखाण पाहून हात नसल्याच्या दुर्बलतेवर त्यानं कधीच विजय मिळवलाय असं वाटतं. दिव्यांग असूनही १२ वीत गुणवंतांच्या यादीत चमकल्यानं परिसरात त्याचं कौतुक होतंय.
हात असणाऱ्यांनाही आश्चर्य वाटावं
कृष्णकुमारला जन्मापासूनच दोन्ही हात नाहीत. आपल्या तीन भावंडांसोबत लहानाचं मोठं होत असताना त्यानं पायानंच सर्व कामं करण्याची कला आत्मसात केलीय. दृढनिश्चय आणि एकाग्रतेनं त्यानं जे करून दाखवलं ते पाहून हात असणाऱ्यांनाही आश्चर्य वाटावं. दिव्यांग असल्यानं याचं कसं होणार, या काळजीत असलेल्या घरच्यांना आता त्याचा अभिमान वाटतोय. मोठं होऊन जिल्हाधिकारी होण्याचं कृष्णकुमारचं स्वप्नं आहे, जेणेकरून घरच्यांना आर्थिक हातभार लागेल.
मला जिल्हाधिकारी व्हायचे आहे, परंतु माझ्या वडिलांची मला पुढे शिकवण्याची क्षमता नाही, माझे वडील मला पुढे शिकवण्यासाठी काही करू शकत नाहीत, मला सरकारकडून काही पैशांची मदत मिळाली तर चागलं होईल. आत्तापर्यंत कुणाकडून कसलीही मदत मिळालेली नाही, असे कृष्ण कुमार म्हणाला. कृष्ण कुमारच्या या कामगिरीवर त्याची शिक्षक मंडळी जाम खूश आहेत. कृष्ण कुमार हा आमचा विद्यार्थी असल्याचा आम्हाला अभिमान आहे, असे त्याचे शिक्षक आनंदानं सांगतात.
शिक्षकांना वाटतो अभिमान
आम्हाला त्याचा अभिमान वाटतो, तो दिव्यांग आहे, हात नसूनही त्यानं इतके चांगले गुण मिळवलेत. त्याचा अभिमान वाटावा असाच तो आहे. अभ्यासात तो हुशार आहे, असे शिक्षक विष्णू कुमार शुक्ला यांनी सांगितले. मऊगंज तालुक्यातील हरजई मुडहान गावच्या राहणाऱ्या कृष्ण कुमारच्या यशाची परिसरात चांगलीच चर्चा आहे. मात्र, त्याचे वडील मुलाच्या या कामगिरीवर आनंदी आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला गरीबी पिच्छा सोडत नसल्याने नाराज आहेत.
कष्टाचे फळ मिळालंय, अडचणी तर बऱ्याच आहेत, येण्या-जाण्यासाठी वाहनाची सोय नाही. घरची स्थिती बेताची आहे. घर-दार आमचं नीट नाही, तुम्ही बघताय नदीचं पाणी नाल्यातून आमच्या घरात घुसतंय.. शासनाची आम्हाला काहीच मदत मिळालेली नाही, मुलांच्याकडं बघून तरी मदत करावी, असे कृष्ण कुमारचे वडील रामजस कुमार यांनी सांगितले.
अडचणी, समस्या यशाच्या आड येऊ दिल्या नाहीत
कृष्ण कुमारच्या घरात अठराविश्व दारिद्र्य अशी परिस्थिती आहे. त्यात ही तिघं भावंडं. वडील मजुरी करून कसाबसा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांच्याकडं चांगलं पक्कं घरसुद्धा नाही. मात्र, कृष्ण कुमारनं या गोष्टी त्याच्या यशाच्या आड येऊ दिलेल्या नाहीत. त्याची शिक्षणातील कामगिरी पाहुन घरच्यांना आपलं भाग्य लवकरच उजळणार, अशी आशा वाटू लागलीय. बारावीत त्यानं मिळवलेलं घवघवीत यश पाहून काही सामाजिक कार्यकर्ते आणि इतर लोकांनी त्याला मदत करण्याचं आश्वासनं दिलंय.