नवी दिल्ली – पर्यावरण प्रभाव आकलनाच्या (ईआयए) कच्चा मसुद्याबाबतच्या अधिसूचनेविषयी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ईआयएबाबतच्या प्रक्रियेत सार्वजनिक सुनावणी शिथील करण्यात आली नाही. तर ही सुनावणीत अधिक अर्थपूर्ण करण्याचा उद्देश असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी ईआयएच्या प्रक्रियेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. जयराम रमेश हे विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि हवामान बदलाच्या संसदीय समितीचे अध्यक्षदेखील आहेत. त्यांच्या आक्षेपाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी पत्रात म्हटले, की प्रत्येक प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी पर्यावरण व्यवस्थापन नियोजनासाठी अर्ज करावा लागतो. कच्चा मसुदा म्हणजे सार्वजनिक सुनावणी प्रक्रिया कमी केल्याचा अर्थ होत नाही.
जयराम रमेश यांना उत्तर दिलेली प्रत जावडेकर यांनी ट्विटरवर शेअर केली आहे. जयराम यांनी पत्र जाहीर केल्याने जावडेकर यांनी त्यांच्यावर टीकाही केली. जावडेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले, की तुमच्या 25 जुलै 2020 च्या पत्राचे उत्तर आज सकाळी रहिवासी कार्यालयाच्या पत्त्यावर पाठविले आहे. या पत्राला उत्तर देवून ते ट्विटरवर जाहीर करावे, हा तुमचा पर्याय आहे.