दौसा - राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात 'हनी ट्रॅप' चे प्रकरण पुढे आले आहे. यामध्ये एका प्रेमी जोडप्याने एका व्यक्तीला जाळ्यात अडकवत, त्याच्याकडून दीड कोटी रुपये हडपल्याचे समोर आले आहे. याबाबत, पीडित व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपासचक्र फिरवत या 'बंटी-बबली' प्रेमी जोडप्याला अटकेत घेतले. किरण बैरवा (रा. बीनावाला गाव) आणि अक्षय उर्फ आशु मीना (रा. दौसा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दौसा शहरातील रामनगर कॉलनीत राहणारे विश्राम बैरवा हे 'प्रॉपर्टी डीलर' आहेत. त्यांना २०१६ मध्ये एका अनोळखी महिलेचा (किरण) फोन आला, तिने आपण घटस्फोटीत असल्याचे सांगितले. त्यानंतर हळू-हळू विश्राम यांच्याशी मैत्री वाढवली. या मैत्रीदरम्यान सन २०१७ मध्ये आरोपी किरण हिने विश्राम यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवले, आणि त्यानंतर बलात्काराची धमकी देत वारंवार पैशाची मागणी केली. या धमकीच्या आधारे किरण हिने विश्राम यांच्याकडून हळू-हळू करत तब्बल दीड कोटी रुपये उकळले.
अखेर या सर्व प्रकाराला कंटाळत, पीडित विश्राम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. यात त्यांनी ज्या रुमवर किरणने त्यांना बोलवले होते, तेथे आशु मीना देखील राहत होता अशी माहिती सांगितली. किरण हिने आशु हा तिचा काका असल्याचे सांगितले होते. पीडित विश्राम यांनी किरण, आशु आणि त्यांच्या नातेवाईकांच्या खात्यात देखील पैसे जमा केल्याचे पोलिसांना सांगितले.
हेही वाचा - 'आम्हांला जनतेचे अपार समर्थन; दिल्लीकरांचं ठरलंय!'
पीडित विश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले, आणि कारवाई करत किरण आणि आशु या दोन्ही आरोपींना अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार किरण आणि आशु पुष्कर येथील एका होटेलमध्ये लग्न करणार होते, त्यांचे होटेलमधील बिलदेखील ६७ हजार रूपये एवढे होते. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - जामिया विद्यापीठाच्या गेट नंबर 5 जवळ अज्ञातांकडून पुन्हा गोळीबार