पुणे Shobhana Ranade passed away :ज्येष्ठ गांधीवादी नेत्या तथा गांधी राष्ट्रीय स्मारक, आगा खान पॅलेसच्या विश्वस्त सचिव पद्मभूषण शोभना रानडे यांचं रविवारी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्या 99 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुली, नातवंडे, असा परिवार आहे. विनोबाजींच्या एकनिष्ठ लाडक्या शिष्या असल्यानं त्यांनी आयुष्यभर खादी ग्रामोद्योग, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, जमीन दान, ग्रामदान, पर्यावरण, बालविकास आणि शिक्षण असे विविध उपक्रम राबविले.
वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार :निराधार महिला आणि अनाथ हे शोभना रानडे सेवेचं केंद्र होतं. रविवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलं. यावेळी बजाज उद्योग समुहाचे संजीव बजाज, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, अभय छाजेड, जनसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. विनोद शहा, गांधी राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त प्रदीप मुनोत, महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे विश्वस्त अभय छाजेड, अन्वर छाजेड आदी मान्यवर उपस्थित होते. रानडे यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी केंद्र सरकारनं 2011 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केलं होतं. त्या 26 ऑक्टोबरला त्यांचा 100 वा वाढदिवस पूर्ण करणार होत्या.
शोभना रानडे यांचा जीवन प्रवास : शोभना रानडे यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1924 रोजी रत्नागिरीत झाला. वयाच्या 16 व्या वर्षी 1940 साली त्यांचा विवाह पुण्यातील सिताराम रानडे यांच्याशी झाला. महात्मा गांधींच्या भेटीनं त्या भारावल्या होत्या. त्यानंतर त्या विनोबांच्या शिष्या झाल्या. आयुष्यभर त्या गांधीवादी विचारांनी काम करत होत्या. 1955 ते1972 या काळात त्यांनी आसाममध्ये विविध प्रकारचे रचनात्मक कार्य केलं. महाराष्ट्रात परतल्यावर त्यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मस्थानी गागोदे बुद्रुक येथे 15 ऑगस्ट 1974 ला अनाथ, निराधार मुलांसाठी पहिलं बाल सदन सुरू केलं. पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये त्यांनी गांधी नॅशनल मेमोरिअल सोसायटीची विश्वस्त सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. या ठिकाणी संपुर्ण भारतातील महिलांना गांधी विचारांवर आधारित समाजकार्य, खादी ग्रामोद्योग आणि नेतृत्व विकास असं विविध प्रकारचं प्रशिक्षण सुरू केलं.
विविध पुरस्कारानं सन्मानित : आगा खान पॅलेसला महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांचं स्मारक उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शोभना रानडे यांनी कस्तुरबा गांधी नॅशनल मेमोरियल ट्रस्ट, गांधी स्मारक निधी, बालग्राम महाराष्ट्राचे विश्वस्त, गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीचे सचिव, अखिल भारतीय महिला निरक्षरता निर्मूलन समिती, अखिल भारतीय महिला परिषद आणि भूदान ग्रामदान मंडळ महाराष्ट्राच्या अध्यक्षा म्हणून काम पाहिलं आहे. निराधार महिला आणि मुलांसाठी केलेल्या सेवेबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. जमनालाल बजाज पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर पुरस्कार, राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, प्राईड ऑफ पुणे पुरस्कार आणि बाल कल्याणासाठी नेहरू पुरस्कार मिळाले आहेत.