पुणे : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत आहे. त्यातच राज्यातील विविध छोटे पक्ष तसंच संघटनांच्या वतीनं 'परिवर्तन महाशक्ती' म्हणून तिसरी आघाडी स्थापन करण्यात आली. परिवर्तन महाशक्तीच्या गुरुवारच्या बैठकीत 150 जागांवर एकमत झालं असून, लवकरच इतर जागांवर चर्चा होऊन उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी दिली.
तिसऱ्या आघाडीची बैठक :स्वराज्य पक्षाच्या कार्यालयात गुरुवारी परिवर्तन महाशक्तीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती, प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू तसेच इतर पक्षातील नेते यावेळी उपस्थित होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
महायुती, महाविकास आघाडीवर टीका :"परिवर्तन महाशक्तीची बैठक झाली आणि या पहिल्या बैठकीत 150 मतदारसंघ फायनल झाले आहेत. लवकरच सर्व जागा फायनल होतील आणि आम्ही आमचे उमेदवार देखील जाहीर करणार आहोत. महाराष्ट्रातले सगळे प्रस्थापित घराणे, सातत्यानं निवडणुका लढवणारे घराणे आता दोन्ही आघाड्यांमध्ये विखुरले आहेत. त्यांच्याशिवाय सुद्धा समाज आहे. राज्यातील 13 कोटी जनतेमध्ये महाराष्ट्राला नेतृत्व देण्याची क्षमता आहे. या प्रस्थापितांनी कधीही सर्वसामान्यांना पुढं येऊ दिलं नाही," असं म्हणत राजू शेट्टी यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर टीका केली. "कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, दिव्यांग नागरिक या सर्वांना सोबत घेऊन आम्ही पुढे जात आहोत," असंही शेट्टी म्हणाले.
दीडशे जागांवर एकमत :"महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन वेगवेगळ्या आकर्षक रंगांचे पॅकेज आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज म्हणजेच फुले-शाहू-आंबेडकर यांची विचारधारा घेऊन जाणारी आमची परिवर्तन महाशक्ती आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक वंचिताला न्याय देणारी आमची ही आघाडी आहे. या आघाडीच्या माध्यमातून आम्ही एक सशक्त असा पर्याय देत आहोत. पहिल्याच प्रयत्नात आम्हाला दीडशे जागांवर एकमत करण्यामध्ये यश आलं आहे," असं म्हणत राजू शेट्टी यांनी तिसऱया आघाडीच्या माध्यमातून रणशिंग फुंकलं आहे.