महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभेचा सारीपाट निवडणूक आयोगानं मांडला, एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला निकाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगानं केली आहे. राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २३ तारखेला निवडणुकीचा निकाल लागेल. वाचा सविस्तर

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Updated : 1 hours ago

निवडणूक आयोगाचे प्रमुख
निवडणूक आयोगाचे प्रमुख (ईटीव्ही भारत)

नवी दिल्ली : राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली. दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे इतर दोन उपआयुक्तही पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर लगेच आचारसंहिताही लागू झाली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक यावेळी जाहीर करण्यात आली.

एकाच टप्प्यात निवडणूक :राज्यात गेल्यावेळेप्रमाणे यावर्षी देखील एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहेत.

निवडणूक वेळापत्रक

निवडणूक अधिसूचना दि २२ ऑक्टोबर

अर्ज भरण्याची अंतिम दि २९ ऑक्टोबर

अर्ज छाननी दि ३० ऑक्टोबर

अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस ४ नोव्हेंबर

मतदान दि २० नोव्हेंबर

निकाल दि २३ नोव्हेंबर

केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद (Source : ANI)

जास्त मतदान होईल :गेल्या वेळेप्रमाणे यावर्षी देखील एकाच टप्प्यात राज्यातील विधानसभा निवडणुका होणार आहे. गेल्यावेळी २०१९ साली २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकाच दिवशी राज्यभर २८८ मतदारसंघात मतदान झालं होतं. गेल्यावेळी राज्यात ६१.४ टक्के मतदान झालं होतं. यावेळी त्यापेक्षा जास्त मतदान होईल अशी अपेक्षा निवडणूक आयोगानं व्यक्त केली आहे.

निवडणूक वेळापत्र (ईटीव्ही भारत ग्राफिक्स)

राज्यातील मतदार, मतदान केंद्रांची संख्या -राज्यातील मतदारांची आकडेवारी पाहता पुरुष मतदार ४.९७ कोटी, ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. तर महाराष्ट्रात १.८५ कोटी तरुण मतदार म्हणजेच २० ते २९ वयोगटातील मतदार आहेत. तसंच २०.९३ लाख मतदार हे पहिल्यांदाच यावेळी मतदान करतील. राज्यात एकूण १००१८६ मतदार केंद्र असतील. राज्यातील ५२७८९ ठिकाणी ही मतदानकेंद्र असतील. यातील शहरी भागात ४२,६०४, तर ग्रामीण भागात ५७५८२ मतदान केंद्र असतील. महिला संचलित३८८ मतदान केंद्र असतील. तर ५३० आदर्श मतदान केंद्र असतील.

गेल्या विधानसभेतील चित्र -यापूर्वी जेव्हा २०१९ साली विधानसभा निवडणूक झाली होती. त्यावेळी एकूण ६१.४% मतदान झालं होतं. निकालानंतर भारतीय जनता पार्टी हा पक्ष आणि शिवसेना पक्ष यांच्या महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. परंतु सरकार स्थापनेवरील मतभेदांनंतर, युती विसर्जित झाली आणि राजकीय संकट निर्माण झालं. कोणत्याही पक्षाला सरकार बनवता न आल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी भल्या पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र त्यांचं हे सरकार औटघटकेचं ठरलं. फडणवीस-पवार यांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी राजीनामा दिला. ते बहुमत चाचणीला सामोरे गेलेच नाहीत. त्यानंतर २८ नोव्हेंबर २०१९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीनं शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. या महाविकास आघाडी अंतर्गत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन नवीन सरकार स्थापन केलं.

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे (ETV Bharat Desk)

वेगवान घडामोडीची पाच वर्षे -हे सरकार अडीच वर्षे टिकलं. त्यानंतर शिवसेनेमध्ये उभी फूट पडली. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील सुरुवातीला १२ फुटले नंतर ४० च्यावर आमदार फुटले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सहकार्यानं नवीन सरकार राज्यात आलं. त्यामध्ये भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यातील अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून या महायुती सरकारमध्ये सामिल झाले.

हेही वाचा...

  1. "ईव्हीएम 100% फूलप्रूफ": मुख्य निवडणूक आयुक्तांनी काँग्रेसचे आरोप फेटाळले
  2. विधानसभा निवडणूक 2024 : नागपुरातलं राजकारण कूस बदलणार? देवेंद्र फडणवीसांची घरच्या मैदानातच कसोटी
Last Updated : 1 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details