महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली, BKC परिसरात सर्वाधिक प्रदूषित हवा

मुंबईतील हवेची गुणवत्ता पुन्हा एकदा ढासळली आहे. बीकेसी भागात सर्वाधिक प्रदूषित हवा असल्याचं समोर आलं.

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

air pollution
हवा प्रदूषण (File Photo)

मुंबई : पावसाळ्यानंतर मुंबईतील हवेच्या गुणवत्तेची स्थिती बदलते, वाऱ्याचा वेग काहीसा कमी होतो. त्यामुळे हवेत साचलेली धूळ आणि प्रदूषक बाहेर पडू शकत नाहीत. बाष्प धुळीचे कण हवेत तरंगत राहतात. या कारणांमुळे पावसाळ्यानंतर मुंबईतील हवा प्रदूषित होत जाते. मंगळवारी सकाळी मुंबईतील हवा निर्देशांक मध्यम श्रेणीत तर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स तसेच शिवाजी नगरमध्ये 'खराब' हवेची नोंद झाली.

हवेत मोठ्या प्रमाणात आर्दता : सोमवारीही मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत होती. मंगळवारी सकाळी मुंबईचा वायू शुद्धता निर्देशांक 114 वर पोहोचला होता. ऑक्टोबर महिना सुरू असल्याने, हवेत मोठ्या प्रमाणात आर्दता असते. तर, सकाळी काही प्रमाणात धुके पडलेले असते. या धुक्यात अनेक प्रदूषित घटक असल्याचे प्रदूषण नियंत्रण मंडळाने म्हटले आहे.


दर्जा कसा ठरवतात :महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदीनुसार, मंगळवारी सकाळी वांद्रे-कुर्ला संकुलातील हवेचा निर्देशांक 202 होता. तर शिवाजी नगरमध्ये 271 इतकी नोंद आहे. सोबतच शिवडीमध्ये 196, वरळीमध्ये 141, चेंबूरमध्ये 108, भायखळ्यामध्ये 124, कुलाब्यात 105, देवनारमध्ये 148 अशी नोंद करण्यात आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांनुसार, हवा गुणवत्ता निर्देशांक परिमाण ठरलेले आहे. त्यानुसार, 0-50 चांगल्या दर्जाची हवा, 51-100 हवेचा समाधानकारक दर्जा, 101-200 हवेचा मध्यम दर्जा, 201-300 हवेचा खराब दर्जा, 301-400 हवेचा अत्यंत खराब दर्जा आणि 400 पेक्षा जास्त धोकादायक दर्जा मनाला जातो.

पालिकेचा ॲक्शन प्लॅन : भारतीय हवामान विभागाने, मुंबई शहर आणि उपनगरांसाठी आपल्या दैनंदिन अंदाजात, मंगळवारपासून पुढचे काही दिवस सकाळी धुके पडेल आणि आकाश निरभ्र राहील असा अंदाज वर्तवला आहे. सोबतच मुंबईचे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील वर्षी देखील मुंबईतील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळल्याने पालिकेने ॲक्शन प्लॅन तयार केला होता. आता यावर्षी मुंबईकरांना प्रदूषणमुक्त हवा देण्यासाठी पालिका नेमकी काय रणनीती आखते हे पाहणं महत्त्वाचं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details