महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

ETV Bharat / state

महायुतीत भाजपाला अजितदादांचा 'राष्ट्रवादी' ठरतोय डोईजड; आता फडणवीस म्हणतात... - BJP Displeasure With NCP

BJP Displeasure With NCP : महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच लोकसभेत कमी जागा मिळाल्याचा पुनरुचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे महायुतीत अंतर्गत धुसफूस कायम असल्याचे दिसत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे मानायला तयार नाहीत.

Devendra Fadnavis Eknath Shinde Ajit Pawar
देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार (संग्रहित छायाचित्र)

मुंबई BJP Displeasure With NCP :- महायुतीतील घटक पक्षांमध्ये अंतर्गत कुरबुरी सुरू असून, त्या अधूनमधून चव्हाट्यावर येत असतात. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच लोकसभेत कमी जागा मिळाल्याचा पुनरुचार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यामुळे महायुतीत अंतर्गत धुसफूस कायम असल्याचे दिसत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हे मानायला तयार नाहीत. महायुतीला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपयशाला सामोर जावं लागलं होतं. त्यातही महायुतीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाला २८ जागा लढवून केवळ नऊ जागा जिंकता आल्या होत्या. पराभवाचे हे शल्य सातत्याने भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते व्यक्त करीत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मुखपत्रात याबाबत जाहीर नाराजी व्यक्त करीत राष्ट्रवादी काँग्रेसमुळेच अपयश आल्याचे म्हटले होते. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील वक्तव्य करणे सातत्याने सुरूच ठेवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळेच आपल्याला अडचण निर्माण झाली आणि जनतेच्या मनात भाजपाविषयी नकारात्मक वातावरण तयार झाले यावर भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते आजही ठाम आहेत.

देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रवादीबाबत नाराजी:दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आता राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट हल्लाबोल केला आहे. एका वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या मतदारांचे परिवर्तन भाजपाच्या उमेदवारांसाठी झाले, मात्र तसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांकडून भाजपाच्या उमेदवारांना मतं मिळाली नाहीत. त्यामुळेच अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची शक्यता असून, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपावरही याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीचा केलेला पुनरुच्चार हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी फारसे चांगले चिन्ह नाही. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसवर नैतिक दबाव आणण्याचा या माध्यमातून प्रयत्न केला जात असल्याचे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक उदय तानपाठक यांनी सांगितले.

महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही - तटकरे : विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते संजय तटकरे म्हणाले की, राज्यातील महायुतीला कोणताही धोका नाही. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, आमच्या काही नेत्यांची अशी धारणा झालीय किंवा भावना होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांचे परिवर्तन न झाल्यामुळे आपल्याला नुकसान झाले आहे. यासंदर्भात आपण कार्यकर्त्यांची बोललो आहोत आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगत तटकरे यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तसेच आगामी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले आमदार यांच्या जागा निश्चितच पुन्हा कायम राहतील, तर अन्य काही जागा जिथे राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर होती, अशा जागासुद्धा आपल्या पक्षाला निश्चित मिळतील, असंही तटकरे म्हणालेत. तसेच त्याबाबतीत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा जागा वाटपावर कोणताही परिणाम होणार नाही. महायुती म्हणून आम्ही भक्कम आहोत आणि आम्ही निश्चितच आगामी निवडणुका जिंकू, असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details