महाराष्ट्र

maharashtra

टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट; सामना न झाल्यास कोण होणार विश्वविजेता? - T20 World Cup Final

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 10:51 PM IST

T20 World Cup Final Weather Forecast : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी बार्बाडोस इथं खेळल्या जाणाऱ्या टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट आहे. त्याचबरोबर रविवारी राखीव दिवशीही पावसामुळं खेळ खराब होऊ शकतो. अशा स्थितीत अंतिम फेरी रद्द होण्याची शक्यता बळावली आहे.

T20 World Cup Final
टी 20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यावर पावसाचं सावट (Etv Bharat)

ब्रिजटाउन (बार्बडोस) T20 World Cup Final Weather Forecast : वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी 20 क्रिकेट विश्वचषकाचा विजेतेपदाचा सामना शनिवारी केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियम, बार्बाडोस इथं भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. या स्पर्धेत हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. अशा स्थितीत दोघांमध्ये काटे की टक्कर अपेक्षित आहे. 10 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्यानं भारत मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी, दक्षिण आफ्रिकेचा संघ आयसीसीचं पहिलं विजेतेपद जिंकण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही.

अंतिम सामन्यावर पावसाचं सावट : शनिवारी हे दोन्ही संघ आमनेसामने आले असताना चाहत्यांना चुरशीचा सामना पाहायला मिळणार आहे. पण, फायनलपूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीला पावसाचा फटका बसल्यानंतर शनिवारी बार्बाडोसमध्ये खेळवण्यात येणाऱ्या अंतिम सामन्यावरही पावसाचं सावट आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अंतिम सामन्यात पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, शनिवारी दुपारी बार्बाडोसमध्ये पाऊस पडण्याची 99 टक्के शक्यता आहे. 29 जून रोजी बार्बाडोसमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. अंतिम सामन्यादरम्यान पावसाची शक्यता 70 टक्क्यांपर्यंत आहे.

राखीव दिवशीही पावसाचा अंदाज : 29 जून रोजी होणाऱ्या विजेतेपदाच्या सामन्यासाठी आयसीसीनं रविवार 30 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. मात्र रविवारीही पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे, ही चिंतेची बाब आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 30 जून रोजीही दुपारी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या दिवशी बहुतांशी ढगाळ आणि दमट असेल, सकाळी वारा असेल आणि नंतर दुपारी पावसासह वादळ असेल.

पावसामुळं सामना रद्द झाल्यास विजेता कोण होणार : शनिवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेतेपदाच्या सामन्यात पावसानं व्यत्यय आणल्यास रविवारी हा सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. मात्र रविवारीही पावसामुळं सामना वेळेवर होऊ शकला नाही, तर त्यासाठी आयसीसीनं अतिरिक्त 190 मिनिटं ठेवली आहेत. या वेळेतही जर पावसानं खेळ होऊ दिला नाही आणि अंतिम सामना पावसामुळं रद्द झाला, तर अशा परिस्थितीत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांना स्पर्धेचे संयुक्त विजेता घोषित केलं जाईल. 17 वर्षांच्या टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात आतापर्यंत संयुक्त विजेता घोषित झालेला नाही.

हेही वाचा :

  1. भारताच्या शेफाली वर्मानं रचला इतिहास...! महिलांच्या कसोटी सामन्यात केला 'हा' भीम पराक्रम - INDW vs SAW Only Test
  2. इंग्लंडला चितपट करत भारत फायनलमध्ये; दक्षिण आफ्रिकेसोबत होणार 'महामुकाबला' - India vs England

ABOUT THE AUTHOR

...view details