कटक : इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं इंग्लंडचा चार विकेट्सनं पराभव करत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या इंग्लंडनं बेन डकेट आणि जो रूट यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४९.५ षटकांत १० गडी गमावून ३०४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर भारतानं ४४.३ षटकांत सहा गडी गमावून ३०८ धावा करत सामना जिंकला. दोन्ही संघांमधील तिसरा सामना १२ फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे.
वन-डे मालिका भारताच्या खिशात : इंग्लंडविरूद्धचा दुसरा सामना कटकच्या मैदानावर खेळवण्यात आला. सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं सर्व फलंदाज गमावून ३०४ धावा करत भारताला विजयसाठी ३०५ धावांचं आव्हान दिलं. फलंदाजीत इंग्लंडकडून बेन डकेट आणि जो रूट यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडनं ३०० धावांचा टप्पा ओलांडला. यात लिविंगस्टोननं ४१ धावांचं योगदान देत मोलाची भूमिका पार पाडली. गोलंदाजीत भारताकडून रवींद्र जडेजानं सर्वाधिक तीन फलंदाज बाद केले. तर, शमी, हर्षित राणा, हार्दिक पंड्या आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.
अर्धशतकी खेळी करून शुभमन बाद : लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी पहिल्या विकेटसाठी १३६ धावांची भागीदारी केली, जी जेमी ओव्हरटननं फोडली. त्यानं १७ व्या षटकात शुभमन गिलला बाद केलं. त्यानं ५२ चेंडूत ६० धावा केल्या. शुभमननं सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. गिलने ४५ चेंडूत त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १५ वे अर्धशतक पूर्ण केले.
विराटकडून पुन्हा निराशा : गिल बाद झाल्यानंतर फलंदाजीसाठी आलेला विराट कोहली मैदानावर फार काळ टिकू शकला नाही. तो अवघ्या पाच धावा करून बाद झाला. यानंतर रोहित आणि श्रेयस अय्यर यांनी धावफलक हलता ठेवला. सामन्याच्या ३० व्या ओव्हरमध्ये शतक झळकवून रोहित शर्मा बाद झाला. रोहितनं आपल्या खेळीत ९० बॉलमध्ये १२ चौकार आणि ७ चौकारांच्या मदतीनं ११९ धावांची खेळी केली.