महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बीसीसीआयची मोठी घोषणा; भारतीय क्रिकेटमध्ये 'गंभीर'युग सुरू, प्रशिक्षकपदाचा कधीपासून घेणार पदभार? - Team India Head Coach

Team India Head Coach : माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक झाला आहे. BCCI सचिव जय शाह यांनी मंगळवारी याबाबतची घोषणा केली. गंभीरनं विश्वविजेता प्रशिक्षक राहुल द्रविडची जागा घेतली.

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 9, 2024, 9:02 PM IST

Updated : Jul 9, 2024, 9:35 PM IST

Team India Head Coach
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा मुख्य प्रशिक्षक (Social Media)

नवी दिल्ली Team India Head Coach :भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरला (Gautam Gambhir) नवी जबाबदारी देण्यात आली. त्याला आता भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आलंय. त्यानं राहुल द्रविडची जागा घेतली. नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून गंभीरची नियुक्ती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी केली.

श्रीलंका दौऱ्यापासून घेणार पदभार : भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा कार्यकाळ टी 20 विश्वचषक 2024 नंतर संपुष्टात आला. 2021 च्या टी 20 विश्वचषकानंतर द्रविडनं मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं हाती घेतली होती. त्याचा कार्यकाळ एकदिवसीय विश्वचषक 2023 पर्यंत होता, परंतु बीसीसीआयनं तो वाढवला होता. आता 42 वर्षीय गौतम गंभीर श्रीलंकेविरुद्धच्या आगामी मालिकेपासून प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारणार आहे. श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ 27 जुलै 2024 पासून 3 एकदिवसीय आणि 3 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे.

गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआर संघ आयपीएल चॅम्पियन : द्रविडचा कार्यकाळ संपल्याच्या बातम्यांसोबतच गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक बनणार असल्याच्या बातम्या आधीच आल्या होत्या. आता जय शाह यांनी याला अधिकृत दुजोरा दिला आहे. सध्या भारतीय संघ शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. यानंतर ते श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहेत. जिथं गंभीर पदभार स्वीकारेल. आयपीएल 2024 पूर्वी गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मार्गदर्शक बनला होता. यानंतर त्यानं आपल्या मार्गदर्शनाखाली केकेआर संघाला चॅम्पियन बनवलं. मुख्य प्रशिक्षकपदासाठी गंभीर हा एकमेव उमेदवार होता. प्रशिक्षकपदाच्या मुलाखतीपूर्वी त्यानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती.

2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये मॅच विनिंग खेळी : गौतम गंभीरनं 4 डिसेंबर 2018 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला होता. गंभीरनं भारतासाठी शेवटचा कसोटी सामना 2016 मध्ये राजकोटमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला होता. गंभीरनं 58 कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करताना 41.95 च्या सरासरीनं 4154 धावा केल्या आहेत, ज्यात नऊ शतकांचा समावेश आहे. तसंच गंभीरनं 147 एकदिवसीय सामन्यांमध्ये 39.68 च्या सरासरीनं 5238 धावा केल्या आहेत. यात 2011 च्या विश्वचषक फायनलमध्ये खेळलेल्या 97 धावांच्या संस्मरणीय खेळीचाही समावेश आहे, ज्यामुळं भारतानं दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. एकदिवसीय सामन्यात त्यानं 11 शतकी खेळी खेळल्या आहेत. गंभीरनं टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही आपली छाप सोडली. त्यानं 37 सामन्यात सात अर्धशतकांच्या मदतीनं 932 धावा केल्या, ज्यात त्याची सरासरी 27.41 होती.

हेही वाचा :

  1. कर्णधार रोहित शर्माबाबत बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची मोठी घोषणा, म्हणाले... - Jay Shah
Last Updated : Jul 9, 2024, 9:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details