महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा; खासदार संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर टीका - PM Narendra Modi

Sanjay Raut On Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत भाषण केलं. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. दिल्लीतील शासकीय निवासस्थानी माध्यमांशी राऊत बोलत होते.

Sanjay Raut On Narendra Modi
खासदार संजय राऊत यांचा मोदींना टोला

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 1:05 PM IST

मुंबई Sanjay Raut On Narendra Modi : राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना, विरोधकांनी दीर्घकाळ विरोधी पक्षात राहण्याचा निर्धार केलाय, असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. आपल्या भाषणात त्यांनी जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासह राहुल गांधींवर निशाणा साधला. राहुल गांधींचं नाव न घेता मोदी म्हणाले की, तेच उत्पादन पुन्हा पुन्हा बाजारात आणण्यासाठी काँग्रेस मागील काही वर्ष प्रयत्न करतंय. आता काँग्रेसच्या त्या दुकानाला टाळं ठोकायची वेळ आलीय. यावर खासदार संजय राऊत यांनी मोदींचा खरपूस समाचार घेतलाय.

पंतप्रधान मोदींना लगावला टोला : "सभागृहात पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आणि देशाच्या धोरणावर बोलायचं असतं. पण, आपल्या पंतप्रधानांनी त्यावर एक चकार शब्द देखील काढला नाही. ही सगळी प्रचारकी भाषणं होती. देशाच्या प्रश्नावर त्यांनी साधा स्पर्श केला नाही. लडाख, दिल्ली, जम्मू-काश्मीर यावर ते काहीही बोलले नाहीत. राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर काय बोलले ते? त्यांच्या भाषणात फक्त काँग्रेसवर टीका होती. काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा," असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावलाय.

मुख्यमंत्र्यांच्या राज्यात गुंडा राज्य : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात गुंडागिरीचा अड्डा सुरू झालाय. पंतप्रधान मोदींनी नेमलेल्या मुख्यमंत्र्यांचं राज्य हे गुंडा राज्य झालंय. महाराष्ट्रात शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शिंदे यांचं सरकार आल्यावर राज्यात 1700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यावर पंतप्रधान बोलले नाहीत. देश हुकुमशाहीकडं चाललाय आणि हे चंदीगढ निवडणूक पाहिल्यावर समजेल."

हे लोकशाहीची हत्या करण्यासारखं : चंदीगड महापौर निवडणुकीच्या प्रकरणात तीव्र नाराजी व्यक्त करताना, सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, हे लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे. निवडणुका निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडणं सर्वात महत्त्वाचं आहे. यावर बोलताना खासदार राऊत म्हणाले की, "न्यायालयाच्या झापण्याला आम्ही जास्त किंमत देत नाही. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांची झापाझापी चांगली पण निर्णय काय येतो? न्यायालयानं राहुल नार्वेकर यांना बरखास्त केलं का? घटनेची पायमल्ली होत आहे पण फक्त झापाझापी आहे. त्या पलीकडं काहीतरी करणं गरजेचं आहे."

यापुढे रोज एक फोटो ट्विट करणार : पुढे बोलताना राऊत म्हणाले की, "अजित पवार, मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव गुंड टोळ्यांना भेटतात. याचे पुरावे म्हणून मी यापुढं रोज एक फोटो ट्विट करणार आहे. मुंबईतील एक माजी पोलीस अधिकारी या गुंडांच्या बैठका घडवून आणतोय. याचा लवकर मी पर्दाफाश करणार आहे. ते पोलीस अधिकारी कोण आहे हे लवकर समजेल. आता मुंबईतील मिठागरे अदानींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे. याविरोधात आम्ही मोर्चा काढला होता. मिठागर, आरे जंगल ही प्राणवायूची हब आहेत. ती लुटली जात आहेत आणि अकार्यक्षम मुख्यमंत्री गुंडांसोबत बसले आहेत."


हेही वाचा -

  1. मुख्यमंत्र्यांचा पुण्यातील गुंडाबरोबरचा फोटो व्हायरल, 'आता रोज एक फोटो ट्वीट करणार', संजय राऊतांचा हल्लाबोल
  2. उघडा नागडा पोपट काय करतोय, आणखी चार खासदारांचे व्हिडिओ लवकरच बाहेर येतील - संजय राऊत
  3. मराठा ओबीसी वाद : मंत्री छगन भुजबळांना मंत्रिमंडळातून तत्काळ काढून टाका, संजय राऊतांचा हल्लाबोल

ABOUT THE AUTHOR

...view details