मुंबई : सरकारनं काही दिवसांपूर्वी पालकमंत्री पदाची घोषणा केली होती. मात्र, पालकमंत्री पदावरून महायुतीत नाराजीनाट्य समोर आल्यानं नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली होती. रायगडचे पालकमंत्री पद मंत्री भरत गोगावलेंना मिळावं, यासाठी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर जाळपोळ केली. यावरून महायुतीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसने भरत गोगावले यांनी केलेली टीका आम्ही खपवून घेणार नाही, जशास तसं उत्तर देऊ, असा इशारा दिला होता. मात्र, या इशाऱयाला मंत्री भरत गोगावले यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.
पालकमंत्री पदावर दावा कायम : "रायगडमधील शिवसेनेचे कार्यकर्ते यांनी रक्ताचं पाणी करून जिल्ह्यात काम केलं. लोकसभेच्या वेळीही आमच्या पक्षाचा उमेदवार नसताना आम्ही युती धर्माचं पालन केलं आणि उमेदवारासाठी काम करून निवडून आणलं. त्यामुळं पालकमंत्री पद मिळावं ही कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांचा उद्रेक झाल्यानं रस्त्यावर आंदोलन होत आहेत. आजही रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर आमचा दावा कायम आहे, अशी भूमिका मंत्री भरत गोगावले यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना मांडली.