महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

"मनसेचा लढा महाराष्ट्राच्या नव्हे, तर..."; आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर खोचक टीका - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ, गढूळ व घाणेरडं करणार्‍या भाजपाला मनसेनं पाठिंबा दिला. मनसे गुजरातच्या भुमीपुत्रांसाठी लढत असल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर टीका (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 10, 2024, 10:18 PM IST

Updated : Nov 10, 2024, 10:57 PM IST

मुंबई : "मनसे महाराष्ट्राच्या भुमीपुत्रांसाठी लढते, असं आम्हाला वाटायचं. मात्र, प्रत्यक्षात मनसे गुजरातच्या भुमीपुत्रांसाठी लढते," असा टोला शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरेंना लगावला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणाऱ्या मोदी सरकारला मनसेनं पाठिंबा दिल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. महाराष्ट्राचं राजकारण गलिच्छ, गढूळ व घाणेरडं केलं, त्याच भाजपाला मनसेनं पाठिंबा दिल्याची टीकाही त्यांनी केली.

समाजात वाद लावणं, भाजपाचा शेवटचा पर्याय : "ज्याप्रमाणे धर्मांतर विरोधी कायद्यावर भाजपा बोलत आहे, त्याप्रमाणे त्यांनी पक्षांतर विरोधी कायद्यावर बोलावं व त्याप्रमाणे कृती करावी. समाजात वाद लावणं, हा भाजपाचा शेवटचा पर्याय असतो. राज्यातील शेतकरी, महिला वर्ग, तरुण वर्ग यांच्या समस्यांवर देखील भाजपानं बोलण्याची गरज आहे. मात्र, ते सातत्यानं केवळ दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशी वक्तव्यं करत राहतील," असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये : "बांगलादेशी नागरिकांची संख्या वाढत असल्याची टीका भाजपानं केली आहे, या टीकेतून त्यांनी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या जवानांवर अविश्वास दर्शवला. 2014 पासून गेली 10 वर्षे भाजपा केंद्रात सत्तेवर आहे. मग ही परिस्थिती का निर्माण झाली? याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे," असं आदित्य ठाकरे म्हणाले. भाजपानं महाराष्ट्रातील जे उद्योग गुजरातमध्ये पळवले, त्यावर बोलण्याची गरज आहे. राज्यातील तब्बल पाच लाख रोजगार गुजरातमध्ये गेले. भाजपा महाराष्ट्रद्वेष्टा असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला.

भाजपानं आमचा पक्ष फोडला : "स्वतःचा पक्ष वाढवण्याऐवजी भाजपानं आमचा पक्ष फोडला. बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष फोडणाऱ्यांना आमच्यावर बोलण्याचा हक्क नाही," असं ते म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रचार सभेत बोलताना ठाकरेंच्या घराणेशाहीवर टीका केली. यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी थेट अमित शाह यांच्या घराणेशाहीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. "बीसीसीआय व आयसीसीमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर शाह यांचा मुलगा जय शाह यांची निवड करण्यात आली. त्यांच्या जागी एखाद्या क्रिकेटपटुची निवड होणं गरजेचं होतं, मात्र त्याठिकाणी जय शाह यांना निवडण्यात आलं," असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी अमित शाह यांच्या टीकेला उत्तर दिलं.

गुजरातचं हित सांभाळणारा मुख्यमंत्री : "राज्यातील गरजू महिलांना आधार देणं गरजेचं आहे. त्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर त्यांना मोफत बस प्रवास करण्याची सुविधा पुरवणार आहोत. वाढत्या महागाईमुळं त्यांना आवश्यक असलेली मदत आम्ही करणार आहोत. महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राच्या हिताचा मुख्यमंत्री बनवेल. मात्रं भाजपाप्रमाणं गुजरातचं हित सांभाळणारा मुख्यमंत्री बनवणार नाही," असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला.

हेही वाचा

  1. "घड्याळ नको, कमळ आणा"; अमित शाहांचा चक्क राष्ट्रवादीविरोधात प्रचार, पाच मिनिटांत उरकलं भाषण
  2. "...तिथं मशाल आलीच पाहिजे"; उद्धव ठाकरेंच्या विधानानं महाविकास आघाडीचं टेन्शन वाढलं?
  3. ऐन निवडणुकीत मनसेची डोकेदुखी वाढण्याची शक्यता; उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल
Last Updated : Nov 10, 2024, 10:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details