महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / politics

कागलचं राजकारण तापलं; हसन मुश्रीफांच्या 'त्या' टीकेला समरजितसिंह घाटगेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, "निष्ठा विकून आल्यामुळं..."

कागलमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध समरजितसिंह घाटगे असा सामना रंगणार आहे. त्यामुळं दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी जोर धरल्याचं बघायला मिळतंय. अशातच मुश्रीफांनी पुन्हा एकदा घाटगेंवर हल्लाबोल केलाय.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

Hasan Mushrif attacks Samarjeetsinh ghatge over kagal assembly constituency
समरजितसिंह घाटगे, हसन मुश्रीफ (ETV Bharat)

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकांच बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आणि इच्छुक उमेदवार जोरदार तयारीला लागलेत. विशेषतः कागल विधानसभा मतदारसंघात निवडणुका जाहीर होण्याआधीच राजकारणाला ऊत आलेलं दिसतंय. शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेलेले हसन मुश्रीफ हे त्यांचे कट्टर विरोधक असलेले राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्यावर खालच्या पातळीचे शब्द वापरत टीका करताना दिसत आहेत. यामुळं मतदारसंघात मुश्रीफ आणि घाटगेंमधील संघर्ष आणखी तीव्र होत असून राजकीय वातावरण तापलेलं आहे. असं असतानाच आता पुन्हा एकदा घाटगे यांच्याविषयी बोलताना मुश्रीफांची जीभ घसरली. त्यामुळं आता नव्या वादाला तोंड फुटलंय.

काय म्हणाले हसन मुश्रीफ? : गडहिंग्लज येथे आयोजित सभेत बोलत असताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, "हा राजा आहे म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी बरीच कामं केली. घाटगे प्रत्येक आठवड्यात 30 ते 35 कामांची यादी घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडं जात असत. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची प्रक्रिया होती. दलाली करण्याचं काम यांनी केलं. हा राजा आहे की भिकारी?", असा खोचक सवाल त्यांनी केला. तसंच आम्ही शरद पवारांना गुरुदक्षिणा देऊन बाहेर पडलो. 35 वर्षांपूर्वी मी शरद पवार यांचं नेतृत्त्व स्वीकारलंय. शरद पवार आमचे दैवत होते, आहेत आणि नेहमी राहणार. आम्ही शरद पवारांना सांगून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनीही त्यासाठी संमती दिली. जनतेनं दोन्ही प्रवृत्त्या तपासून डोळे उघडून मतदान करावं. विरोधकांचे विचार आणि प्रवृत्ती लोकांसमोर ठेवणं आवश्यक असल्याचंही मुश्रीफ म्हणाले.

हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगेंचे आरोप-प्रत्यारोप (ETV Bharat Reporter)

मुश्रीफांच्या टीकेला घाटगेंचं प्रत्युत्तर : या टीकेला जोरदार प्रत्युत्तर घाटगे म्हणाले की, "हसन मुश्रीफ निष्ठा विकून आल्यामुळं त्यांना रात्री झोप येत नाही. या आधी देखील त्यांनी अनेकवेळा निष्ठा विकली आहे. निवडणूक जाहीर होण्याआधीच त्यांच्याकडून असे शब्द येताय. कारण, कागल गडहिंग्लज उत्तूरची स्वाभिमानी जनता विरुद्ध हसन मुश्रीफ अशी ही निवडणूक होत आहे. मतदारांनी आता परिवर्तनाचा निर्णय घेतलाय. यामुळं मुश्रीफ असं बोलताय. असे शब्द वापरून त्यांना वाटतंय की समोरुन देखील अशाच पद्धतीनं उत्तर यावेत आणि आमच्यात जुगलबंदी व्हावी. त्यांनी कागलंच नाव खराब व्हावं याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय." तसंच हसन मुश्रीफ यांनी केलेलं वक्तव्य म्हणजे कागल, गडहिंग्लज, उत्तूर विधानसभा मतदारसंघातील जनतेचा अपमान आहे. त्यांनी माझी नाहीतर या मतदार संघातील मतदारांची माफी मागावी, असंही घाटगे म्हणालेत.

हेही वाचा -

  1. सुप्रिया सुळेंनी 'त्या' कार्यक्रमाला जायला नको होतं; मंत्री मुश्रीफांची समरजीत घाटगेंवर टीका - Hasan Mushrif
  2. "यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफांना शरद पवारांचा..."समरजीत घाटगे थेट बोलले! - Samarjit ghatage special interview

ABOUT THE AUTHOR

...view details