महाराष्ट्र

maharashtra

पंकजा मुंडेंचा राजकीय वनवास संपला...! 10 वर्षांनी उधळला विजयाचा 'गुलाल' - mlc election results 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 7:34 PM IST

Updated : Jul 12, 2024, 9:47 PM IST

Pankaja Munde : अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानपरिषद निवडणुकींचा निकाल हाती आला असून यात भाजपाच्या पंकजा मुंडे विजयी झाल्या आहेत. यामुळं त्यांचा राजकीय वनवास संपला असून त्यांनी 10 वर्षांनी विजयाचा गुलाल उधळला आहे.

Pankaja Munde
पंकजा मुंडेंचा विजय (ETV Bharat MH Desk)

मुंबई Pankaja Munde : राज्याचंच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल हाती आला असून यात भाजपा नेत्या पंकजा मुंडेचा विजय झाला आहे. विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडेंना 26 मतं मिळाली आहेत. त्यामुळं या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. पंकजा मुंडेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडेंचा तब्बल 24 हजार मतांनी पराभव करत मोठा विजय मिळवला होता. त्यावेळी अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसह पंकजा मुंडेंनी आनंदोत्सव साजरा करत विजयाचा गुलाल उधळला होता. मात्र, त्या गुलालानंतर संसदीय राजकारणातील विजयाचा गुलाल उधळण्यासाठी त्यांना तब्बल 10 वर्षांची वाट पाहावी लागली. त्यात, 2019 च्या विधानसभेतील पराभवानंतर जवळपास 5 वर्षांचा राजकीय वनवास त्यांच्या नशिबी आला होता. त्यामुळं आता विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्तानं 10 वर्षानंतर पंकजा मुंडेंनी विजयाचा गुलाल उधळला.

पंकजा मुंडेंच्या समर्थकांचा जल्लोष (ETV Bharat Reporter)

लोकसभा निवडणुकीत पराभव : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा भाऊ धनंजय मुंडे यांच्याकडून पराभव झाला. या पराभवानंतर त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, त्यांचं राजकीय पुनर्वसन केवळ चर्चेतच राहिलं. यादरम्यान भाजपाकडून अनेक नवख्या चेहऱ्यांना संधी मिळाली. मात्र, पंकजा मुंडेंना वेट अँड वॉच करावं लागल्याचं पाहायला मिळालं. यात विशेष म्हणजे गोपीनाथ मुडेंचे समर्थक असलेल्या डॉ. भागवत कराड यांना भाजपानं राज्यसभेवर घेऊन त्यांना केंद्रीयमंत्री बनवलं. परंतु पंकजा मुंडेंना पुन्हा प्रतिक्षाच करावी लागली. अखेर नुकत्याच झालेल्या लेकसभा निवडणुकीत भाजपाकडून बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडेंना तिकीट देऊन त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न झाला. मात्र राज्यात गाजत असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि बीडमधील सामाजिक असमतोलतेचा फटका बसल्यानं त्यांना अल्पशा मतांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.

आमदार म्हणून राजकीय विजनवास संपला : पंकजा मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2009 मध्ये झाली. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यामुळं त्यांच्या म्हणजेच परळी विधानसभा मतदारसंघातून त्यांच्या कन्या पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या भाषणातून तसंच वागण्यातून वडील गोपीनाथ मुंडे यांची छाप दिसत असल्यानं लोकांनीही राजकारणात त्यांना स्वीकारलं. परिणामी 2009 मध्ये परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून आल्या. त्यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा त्यांनी परळीतून विजय मिळवला आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपा युतीच्या सरकारमध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांना मिळालेल्या ग्रामीण विकास, महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या मंत्री म्हणून त्यांनी त्याकाळात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. मात्र जून 2015 मध्ये, काँग्रेसनं पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. निविदा न काढता चिक्की खरेदीला मंजूरी देऊन नियमांचे उल्लंघन करत भ्रष्टाचाराचे आरोप पंकजा यांच्यावर झाले. पण, त्यांनी सगळे आरोप फेटाळून लावले होते.

हेही वाचा :

  1. विधानपरिषदेत महायुतीचा दबदबा कायम; ठाकरेंचं 'मिलिंद' विजयी, तर शरद पवारांना धक्का - Maharashtra MLC Results 2024
Last Updated : Jul 12, 2024, 9:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details