महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

भारत कॅनडा द्विपक्षीय संबंधातील कडवटपणा ट्रुडोंच्या राजकीय भवितव्यासाठी घातक

कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्या भारतविरोधी भूमिकेची मुळं ही केवळ निज्जरच्या हत्येमध्येच नाहीत. तर त्यांच्या २०१८ मधील भारत भेटीत दडलेली आहेत. याचाच उलगडा करणारा लेख.

By Major General Harsha Kakar

Published : 5 hours ago

Updated : 5 hours ago

कॅनडा आणि भारत संबंधाची क्षणचित्रे
कॅनडा आणि भारत संबंधाची क्षणचित्रे (AP, PTI)

कॅनडातील उच्च अधिकाऱ्यांची अलीकडील विधाने पाहिली तर त्यामध्ये, कॅनडातील खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या कथित हत्येशी भारताचा संबंध जोडण्याचा हेतू होता हे स्पष्ट दिसतं. मात्र कॅनेडियन सरकारची बनावटगिरी दुसऱ्या गोष्टीतून दिसते, ती म्हणजे तेथील नागरिकांनीच त्यांच्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यातून ही विधानं म्हणजे 'सेव्ह ट्रूडो' मोहिमेचा भाग असल्याचं दिसून आलं. कॅनेडियन लोकांच्या सोशल मीडियातील यासंदर्भातील भावना या भारतापेक्षा त्यांच्या स्वतःच्या सरकारवर अविश्वास दाखवणाऱ्या होत्या.

भारत कॅनेडियन संबंधांना तडा गेला त्यासाठी निज्जरचा मृत्यू हे कारण नसून त्याचं मूळ कारण हे फेब्रुवारी 2018 मध्ये ट्रूडो कुटुंबाच्या सात दिवसीय भारत भेटीत आहे. त्यावेळी सहाव्या दिवशी पंतप्रधान मोदींनी त्यांची भेट घेतली, तीही फक्त एक औपचारिकता होती. कौटुंबिक फोटो व्यतिरिक्त कोणत्याही चर्चेशिवाय ही भेट झाली होती. यामुळे ट्रुडोंचा अहंकार दुखावला गेला. कारण त्यांच्या राजकीय फायद्याची कोणतीही चर्चा झाली नाही तसंच त्यांच्या या भेटीवर अनावश्यक खर्चासाठी देशांतर्गत आक्षेप घेतला गेला. शीख समुदायाला आकर्षित करण्याचा त्यांचा हा प्रयत्नही फोल ठरला होता.

ट्रूडो यांच्यासाठी सर्वात वाईट गोष्ट म्हणजे गेल्या सप्टेंबरमध्ये त्यांची G20 भारत भेट. ते कदाचित एकमेव जागतिक नेते होते ज्यांच्याशी पंतप्रधान मोदींचा कोणताही अधिकृत द्विपक्षीय संवाद झाला नव्हता. मात्र खलिस्तान चळवळीला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या. ट्रुडो यांनी भारतीय राष्ट्रपतींनी आयोजित केलेला औपचारिक स्नेहभोजन कार्यक्रम वगळत, त्यांच्यासोबत आलेल्या मुलाला एका रेस्टॉरंटमध्ये त्यांनी नेलं.

भारतीय उच्चायुक्तालय कॅनडा (AP)

त्याही पुढे जाऊन कॅनडाच्या पंतप्रधानांच्या विमानात यांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांना दिल्लीत एक दिवस जास्त घालवावा लागला होता. त्यामुळे त्यांचं हसू झालं होतं. या सगळ्यांच्या बाबत प्रश्न विचारला असता ट्रूडो यांनी प्रथमच निज्जरच्या हत्येमध्ये भारताच्या सहभागाचा उल्लेख केला होता. जस्टीन ट्रूडो यांनी असा दावा केला होता की 11 ऑक्टोबर रोजी व्हिएंटियान, लाओस येथे झालेल्या आसियान शिखर परिषदेत त्यांच्यात आणि पंतप्रधान मोदी यांच्यात ‘चर्चा’ झाली होती. त्यांनी नमूद केलं की, ‘दोन्ही देशांना एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. कॅनेडियन लोकांची सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्था राखणं ही कॅनडाच्या सरकारची मूलभूत जबाबदारी आहे आणि त्यावरच ते लक्ष केंद्रित करतील.’

भारतीय प्रवक्त्याने मात्र जस्टीन ट्रुडो यांच्या आणि पंतप्रधान मोदी यांच्यात व्हिएंटियानमध्ये कोणतीही ठोस चर्चा झाली नाही असं स्पष्ट करुन त्यांना उघडं पाडलं. तसंच कॅनडाच्या भूमीवर भारतविरोधी खलिस्तानी कारवाया होऊ दिल्या जाणार नाहीत आणि कॅनडाच्या भूभागातून भारताविरुद्ध हिंसाचार, अतिरेकी आणि दहशतवादाचा पुरस्कार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, अशी भारताची अपेक्षा आहे, असं ठासून सांगितलं.

कॅनडाचे उपउच्चायुक्त (PTI)

अगदी अलीकडच्या घडामोडींमध्ये कॅनडाने दावा केला की त्यांनी भारतीय अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली, कारण कॅनडाचा दावा आहे की त्यांनी निज्जरच्या हत्येत भारताच्या सहभागाचे पुरावे सादर केले आहेत, मात्र भारतानं अधिकृतपणे ही बाब स्पष्ट केली आहे की, असा कोणताही पुरावा कॅनडानं दिलेला नाही. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री मेलानी जोली यांनी सांगितलं की भारत 'कॅनेडियन नागरिकांविरुद्ध मोहिमेमध्ये सामील आहे.' आरसीएमपीच्या प्रमुखानं सांगितलं की भारत 'बिश्नोई टोळीसाठी काम करणाऱ्या खलिस्तानी कार्यकर्त्यांना लक्ष्य करत आहे.' कॅनडाच्या देशांतर्गत व्यवहारात भारतीय हस्तक्षेप यातून अधोरेखित होतो.

कॅनडाच्या उच्चायुक्तांची पत्रकार परिषद (PTI)

भारत सरकारनं आपल्या याच बाबतीत प्रतिक्रिया दिली असून, ज्याचा उल्लेख परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात करण्यात आला आहे. 'कॅनडाच्या राजकारणात परकीय हस्तक्षेपाकडे डोळेझाक केल्याबद्दल टीका होत असताना, त्यांच्या सरकारनं हे नुकसान कमी करण्याच्या प्रयत्नात जाणीवपूर्वक भारताला मध्ये ओढलं आहे.'

काही दिवसांपूर्वी, CSIS संचालक, व्हेनेसा लॉयड यांनी परकीय हस्तक्षेप चौकशीपूर्वी साक्ष देताना नमूद केलं होतं की, ‘पाकिस्तान खलिस्तानी अतिरेक्यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशानं कॅनडामध्ये गुप्तचर ऑपरेशन्स आणि आंतरराष्ट्रीय दडपशाही चालवतो.’ त्यात भारताचा उल्लेख नव्हता. कॅनडाचं सरकार खलिस्तानला प्रोत्साहन देण्यासाठी पाकिस्तानसोबत काम करत आहे, असा त्यांच्या विधानाचा अर्थ आहे.

दिल्लीतील कॅनडाचे उच्चायुक्तालय (AP)

ट्रुडो यांचं सरकार सध्या कॅनडाच्या संसदेत अल्पसंख्याक सरकार आहे. खलिस्तान समर्थक जगमीत सिंग यांच्या नेतृत्वाखालील NDP (न्यू डेमोक्रॅटिक पार्टी) ने पाठिंबा काढून घेतला आहे. क्युबेकमधील एका महत्त्वपूर्ण पोटनिवडणुकीत नुकत्याच झालेल्या पराभवामुळे त्यांच्या लिबरल पक्षाच्या 20 हून अधिक खासदारांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. जस्टीन ट्रूडो विरोधी खासदारांची संख्या वाढत आहे. जस्टीन ट्रुडो लाओसमध्ये असताना त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर आला आणि त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्याचा दावा केला. तेथून परतल्यानंतर लगेचच आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सुरू झाला आणि त्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील मुत्सद्यांची हकालपट्टी झाली. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून पुन्हा एकदा देशाचं लक्ष भारताच्या निषेधाकडं वळवण्याचा त्यांचा हेतू होता. कॅनडामध्ये पुढील वर्षी निवडणुका होणार आहेत. ट्रूडोंच्या अयशस्वी आर्थिक आणि इमिग्रेशन धोरणांमुळे त्यांच्या पक्षाचा पराभव झाला आहे. त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी त्यांना काढून टाकण्याआधी ते किती काळ टिकतील हे पाहावं लागेल.

शीख कॅनेडियन लोकांमध्ये जस्टीन ट्रुडो लोकप्रिय आहेत याचीही ट्रुडो यांना जाणीव आहे. शेवटी, त्यांनी भारतातील शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं. तसंच बनावट पासपोर्टवर येताना छळाचा दावा करणाऱ्या शीखांना नागरिकत्व देण्याबाबतही ते उदारमतवादी होते. भारतावर शीख समुदायाच्या सदस्याला लक्ष्य केल्याचा आरोप करून आणि भारतीय मुत्सद्द्यांविरुद्ध फुटीरतावाद्यांच्या कारवायांकडे डोळेझाक केल्याचा आरोप करून, जगमीत सिंगनी डावलले असूनही, त्यांना शिखांची मते मिळवण्याची आशा आहे.

जी ७ बैठकीच्यावेळी पंतप्रधान मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो (PIB)

कॅनडाच्या आरोपांना फक्त अमेरिकेकडूनच पाठिंबा मिळत आहे. केवळ अमेरिकेतील माध्यमांनी ट्रूडोंच्या आरोपांना हेडलाईन्समध्ये स्थान दिलं. कॅनडाला इतरांचंही भारतविरोधी वक्तव्यांमध्ये समर्थन मिळत नसल्याचं दिसतं. केयर स्टारर यांच्याशी भारताच्या वादावर ते बोलले. मात्र त्यांच्याकडूनही काही प्रतिसाद मिळाला नाही. न्यूझीलंडचे परराष्ट्र व्यवहार मंत्री विन्स्टन पीटर्स यांनीही यासंदर्भात भारताचा उल्लेख करणं टाळलं आहे. याच पार्श्वभूमिवर आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी ट्रुडो मात्र वेळोवेळी भारतावर आरोप करताना दिसतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्रूडोंवर कधीही भाष्य केलेलं नाही, उलट परराष्ट्र कार्यालयाच्या प्रवक्त्यांवर यासंदर्भात बोलण्याचे अधिकार दिले. त्यातून कितीही दबाव आला तरी भारत झुकणार नाही हे त्यांनी सिद्ध केलं आहे. मोदींना याची जाणीव आहे की, ट्रुडो भारतावर आरोप करुन स्वतःला सावरण्यात गुंतले आहेत. कॅनडामध्ये जोपर्यंत ट्रुडो सत्तेत राहतील तोपर्यंत कॅनडासोबतचे भारताचे संबंध कधीही सामान्य होऊ शकत नाहीत. मात्र आगामी निवडणुकीनंतर जर ट्रुडो पायउतार झाले तर, भारत कॅनडा संबंध पूर्ववत होतील असं आज तरी म्हणावं लागेल.

हेही वाचा..

देशांतर्गत राजकारणाच्या नादात कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांची फसगत, भारत-कॅनडा संबंधांना तडा

Last Updated : 5 hours ago

ABOUT THE AUTHOR

...view details