जयपूर Dharamshala Roof Collapsed :निर्माणाधीन धर्मशाळेचं छत कोसळून चार मजुरांचा मृत्यू झाला तर तब्बल 9 जण गंभीर जखमी झाले. ही घटना राजसमंद जिल्ह्यातील खमनोर जिल्ह्यातील बलाई बस्ती इथं सोमवारी रात्री घडली. बाहेर काढण्यात आलेल्या जखमी मजुरांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात भगवतीला शंकलराल साळवी ( वय 40 ) भंवरलाल लच्छा साळवी ( 50 ), शांतीलाल नारुलाल साळवी ( 35 ), कालूलाल वेणा साळवी ( 40 ) यांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच राजसंदचे जिल्हाधिकारी डॉ. भंवरलाल आणि पोलीस अधीक्षक मनीष त्रिपाठी घटनास्थळी दाखल झाले. पाच तास चाललेल्या बचावकार्यानंतर 9 जखमी आणि 4 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली असून संपूर्ण गाव रात्रभर जागून राहिलं आहे.
साफसफाईसाठी मजूर गेले होते धर्मशाळेत :राजसमंद जिल्ह्यातील खमनोर परिसरात चिकलवासातील बलाई बस्ती इथं धर्मशाळेचं बांधकाम सुरू आहे. या बांधकामावर अनेक मजूर कार्यरत आहेत. मंगळवारी हे मजूर साफसफाई करण्यासाठी निर्माणाधीन धर्मशाळेत गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तर राजसमंदचे जिल्हाधिकारी डॉ. भंवरलाल म्हणाले की, "मेघवाल समाजाच्या वतीनं लोकसहभागातून चिकलवास गावात धर्मशाळा बांधण्यात येत आहे. सोमवारी छताखालील बांबूचे खांब काढण्यात आले. त्यानंतर सोमवारी रात्री नऊ वाजता मजूर बांधकाम सुरू असलेल्या धर्मशाळेची साफसफाई आणि रंगरंगोटी करण्यासाठी गेले होते. यावेळी रात्री 9.30 वाजता छत कोसळून खाली पडलं. त्याखाली साफसफाईचं काम करणारे 13 जण दबले गेले. या धर्मशाळेच्या आसपास घरं नव्हती. त्यानंतर छताखाली दबलेले वॉर्डाचे पंच हिरालाल यांनी मोबाईलवरून फोन करून अपघाताची माहिती गावात दिली. त्यानंतर गावातून मोठ्या संख्येनं ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. खमनोर पोलीस ठाण्याचे प्रभारी भगवान सिंह, नाथद्वाराचे डीएसपी दिनेश सुखवाल घटनास्थळी पोहोचले. जिल्हाधिकारी डॉ. भंवरलाल, पोलीस अधीक्षक मनीष त्रिपाठी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र कुमार हेही रात्री 10.30 वाजता घटनास्थळी पोहोचले. यावेळी SDRF पथकासह नागरी संरक्षण कर्मचाऱ्यांना पाचारण करून बचावकार्य करण्यात आलं."