नागरकुर्नूल (तेलंगणा) : तेलंगणातील नागरकुर्नूल जिल्ह्यात निर्माणाधीन एसएलबीसी बोगद्यात मोठी दुर्घटना घडली आहे. बोगद्याच्या छताचा तीन मीटरचा भाग कोसळला असून त्यामुळे आठ कामगार आत अडकले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. अडकलेले कामगार हे पंजाब, जम्मू-काश्मीर, झारखंड आणि उत्तर प्रदेशमधील रहिवासी आहेत. त्याचवेळी 42 कामगार सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले, त्यापैकी दोन जण जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आठ कामगार अडकले :एसएलबीसी बोगद्याच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी चार दिवसांपूर्वी बांधकामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. अमराबाद विभागातील डोमलपेंटाजवळ शनिवारी सकाळी ही घटना घडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, सकाळी साडेआठच्या सुमारास मातीचा ढिगारा पडू लागला, त्यामुळं पहिल्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या ५० कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. ४२ कामगार सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले, तर आठ कामगार आत अडकलेत.
पंतप्रधानांनी बचावकार्याचा घेतला आढावा :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्याशी फोनवर बोलून एसएलबीसी बोगद्यात अडकलेल्या लोकांच्या सुटकेबाबत चर्चा केली. बचावकार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले. बचावकार्यासाठी सैन्य आणि एनडीआरएफला पाचारण करण्यात आले आहे. मंत्री उत्तमकुमार रेड्डी आणि जुपल्ली कृष्णराव यांनी घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेतला.
घटनेवर मुख्यमंत्र्यांनी केलं दु:ख व्यक्त :तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी एसएलबीसी बोगद्यातील दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले असून अधिकाऱ्यांना बचावकार्याला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. तेलंगणाच्या सीएमओने एका निवेदनात म्हटले आहे की, बोगद्याचे छत कोसळल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सतर्क केले. या घटनेत काही जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, एसपी, अग्निशमन सेवा विभाग, HYDRAA यांना तातडीने घटनास्थळी पोहोचून मदत उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
हेही वाचा -
- उत्तराखंडच्या बोगद्यात कामगार कसे अडकले? त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या सविस्तर
- उत्तरकाशीत बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू, 800 मिमीचे सहा पाईप टाकले
- Uttarkashi Tunnel Accident Rescue : उत्तरकाशी बोगद्यातून 40 कामगारांची सुटका करण्याकरिता प्रशासनाकडून करण्यात येणार 'हा' उपाय