हैदराबाद :बांगलादेश आणि म्यानमारमधील तरुणींना भारतात आणून त्यांना वाममार्गाला लावणाऱ्या मानवी तस्करीचं रॅकेट हैदराबाद पोलिसांनी उघड केलं. तस्करी करण्यात आलेल्या तरुणी आणि महिलांना त्यांच्या वयाप्रमाणं भाव ठरवण्यात येतात. त्यानंतर त्यांना दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि विशाखापट्टण सारख्या देशाच्या विविध शहरात पाठवलं जाते, असा धक्कादायक खुलासा पोलीस तपासातून उघड झाला आहे. कोलकाता इथून चालणाऱ्या या मानवी तस्करीच्या रॅकेटचा हैदराबाद पोलिसांनी पर्दापाश केला. त्यामुळे हैदराबाद पोलिसांचं मोठं कौतुक करण्यात येत आहे.
हैदराबाद पोलिसांनी केली 7 तरुणींची सुटका :हैदराबाद पोलिसांच्या सिटी टास्क फोर्सला एका संशयित मानवी तस्करी केंद्राबाबत खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानंतर सिटी टास्क फोर्सच्या पोलिसांनी या संशयित मानवी तस्करी केंद्रावर छापा मारला. यावेळी पोलिसांनी तीन अल्पवयीन तरुणींची सुटका केली. यावेळी हैदराबाद पोलीस दलातील जवानांनी अटक केलेल्या तस्करांची कसून चौकशी केली. यावेळी कोलकाता इथून राष्ट्रीय पातळीवर चालणाऱ्या मानवी तस्करीची धक्कादायक माहिती उघड करण्यात हैदराबाद पोलिसांना यश आलं.
मानवी तस्करांची कशी आहे 'मोडस ऑपरेंडी' :मानवी तस्कर तरुणींना बांगलादेशातून पश्चिम बंगालमध्ये घेऊन जातात. पश्चिम बंगालमध्ये तस्करी केलेल्या तरुणींना सर्वाधिक किंमत घेऊन दलालांच्या हवाली केलं जाते. काही तस्कर तरुणींच्या कुटुंबीयांना अल्पवयीन मुलींसाठी 20 हजार रुपये आणि तरुणींसाठी 35 हजार रुपये देतात. भारतात विलासी जीवन जगण्याचं आश्वासन देऊन आमिष दाखवतात. काही जण रोजगाराच्या आशेनं अशा मानवी तस्करांना बळी पडतात. भारतात आणल्यानंतर या तरुणींना ब्युटी पार्लर, मसाज सेंटर, वेश्यालय आणि हॉटेलमध्ये पाठवलं जाते. कोलकातामध्ये बनावट आधार आणि मतदार ओळखपत्रं तयार केली जातात. त्यामुळे त्यांना दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, चेन्नई आणि विशाखापट्टणम सारख्या प्रमुख शहरांमध्ये नेण्यापूर्वी खोटी भारतीय ओळखपत्रं दिली जातात. कोलकातामधील दलाल प्रत्येक मुलीसाठी 1-2 लाख रुपये आकारतात. या तरुणींना डेटिंग अॅप ऑपरेटर, स्पा सेंटर आणि वेश्यालय व्यवस्थापकांना विकतात. त्यानंतर या तरुणींचं शोषण करण्यात येते.