मुंबई -मुंबई महानगरपालिकेने मोकळ्या जागा, पुलाखाली मोकळ्या जागेच्या ठिकाणी उद्याने उभारली आहेत. या उद्यानात लोकांनी जास्त संख्येने यावे म्हणून पालिकेकडून नवनवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत. पालिकेने आपल्या २४ विभाग कार्यालयाच्या हद्दीत प्रत्येकी एक प्रमाणे २४ उद्यानात सीएसआर फंडामधून मोफत वाचनालय उभारण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी पहिल्या वाचनालयाचे उद्घाटन पूर्व उपनगराच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे ( Ashwini Bhide ) यांच्या हस्ते आज ( 2 मे ) कूपरेज बँडस्टँड उद्यानात करण्यात ( BMC First Free Library ) आले.
पालिका उद्यानात विविध उपक्रम - बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत विविध उद्यानांमध्ये सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. ‘Morning Raga’, ‘NCPA@ThePark’ यांसारखे विविध सांगितिक कार्यक्रम आणि इतर सुखद उपक्रम राबवून मुंबईकरांचे धावपळीचे जीवन आल्हाददायी करण्याचा प्रयत्न उद्यान विभागाकडून नेहमीच होत राहिलेला आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र पदरेशी यांनी दिली. विविध उद्यानांमध्ये सामाजिक दायित्वाच्या माध्यमातून मोफत वाचनालयाच्या संकल्पनेची सुरूवात कूपरेज उद्यानापासून केली गेली आहे. सोशल मीडिया आणि मोबाईलच्या दुनियेत हरविलेल्या नव्या पिढीला वाचनामध्ये रस निर्माण करून एक समृद्ध समाज निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे.
या वाचनालयांमध्ये निसर्गविषयक, विविध महापुरूषांच्या जीवन चरित्रविषयक, इतिहासविषयक, वृक्ष-फुले-फळांविषयक, आरोग्यविषयक, चांगल्या जीवन शैलीविषयक त्याचप्रमाणे लहानग्यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्हावा. या हेतूने विविध बोधपर गोष्टी तसेच खेळ आणि व्यायामाविषयी आवड निर्माण व्हावी, म्हणून त्या संदर्भातील पुस्तकेही या वाचनालयांमध्ये वाचनास उपलब्ध करून देण्यात आली आहेत. येत्या काही दिवसांत २४ विभागातील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २४ उद्यानांमध्ये वाचनालय या माध्यमातून उभारण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.
वाचन साहित्य मोफतपणे वाचणे शक्य -उद्याने, मैदाने, मनोरंजन मैदाने, पार्क अशा प्रकारच्या महानगरपालिकेच्या ताब्यात असलेल्या भूखंडांवर बांधलेली वास्तू ( Built up Structure ), गजेबो ( Gazebo ) उपलब्ध आहेत. या उद्याने आणि जागांमध्ये योग्य अशा ठिकाणी छोटेखानी कपाट ठेऊन त्यामध्ये वाचनासाठी पुस्तके, ग्रंथ ठेवण्यात येत आहेत. उद्यानास भेट देणाऱया नागरिकांना सदर वाचन साहित्य मोफतपणे वाचणे शक्य होईल. वाचन झाल्यानंतर सदर साहित्य उद्यानांमधील कपाटांमध्येच परत ठेवले जाईल. आजच्या तंत्रज्ञान युगात प्रत्यक्ष वाचन साहित्याऐवजी मोबाईल, टॅबलेट, संगणक इत्यादी उपकरणांच्या ( Screen Devices ) आभासी विश्वात युवा पिढी हरवत चालली आहे. त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करून त्यांना तणावमुक्त होता यावे, त्यासोबतच त्यांचे ज्ञान वृद्धिंगत व्हावे, हा यामागील उद्देश आहे. लुप्त होत चाललेल्या वाचनालय संस्कृतीस संजीवनी प्राप्त करून देण्याकरीता हा उपक्रम योगदान देऊ शकेल. प्रत्येक विभागातील एक उद्यान अशा प्रकारे मुंबईतील २४ उद्यानांमध्ये हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला जाणार आहे, अशी माहिती परदेशी यांनी दिली
हेही वाचा -Shivaji Maharaj Samadhi Controversy : 'लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या समाधीत भ्रष्टाचार केला'